नवी दिल्ली – करोनाचे सावट असले तरीही या महिना अखेरपर्यंत सराव शिबिरे सुरू व्हावीत यासाठी आग्रही असल्याचे मत केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजीजू यांनी व्यक्त केले आहे.
करोनामुळे देशातील लॉकडाऊन 17 मे पर्यंत कायम ठेवली गेल्याने क्रीडा स्पर्धा जरी सुरू होणार नसल्या तरीही आगामी ऑलिम्पिक स्पर्धा समोर असताना किमान सराव शिबिरे तरी सुरू व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) तसेच अन्य खासगी क्रीडा प्रशिक्षण शिबिरांना सुरुवात झाली तर खेळाडूंना एक वर्ष हातात मिळेल.
सध्या साईतील शिबिर सुरू झाले तर येत्या काळात अन्य खेळांची शिबिरेही सुरू करता येतील, असेही रिजीजू यांनी सांगितले. बंगळुरू तसेच पतियाळातील प्रशिक्षण केंद्रात ऑलिम्पिकला पात्र ठरलेले खेळाडू राहात आहेत. तिथे अन्य कोणाला प्रवेश न देता शिबिरे सुरू करता येतील. त्यासाठी स्थानिक संघटना व संस्था यांच्याशी चर्चा करून अन्य कुठे सराव शिबिरे सुरू करण्यास अडचण येणार नाही याचा देखील आढावा घेण्यात येइल, असे रिजीजू म्हणाले.