मुंबई – विधानसभा निवडणुकीनंतर महिनाभर सुरु असलेल्या सत्तानाट्यावर पडदा पडला असून, महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले आहे. सभागृहात महाविकास आघाडीच्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज पार पडला. महाविकास आघाडीने विश्वासदर्शक ठराव 169 मतांनी जिंकला आहे.
दरम्यान, आज संसदीय अधिवेशनाचं कामकाज सुरु होण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात पोहोचल्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गळाभेट घेतली. त्यानंतर ते आपल्या जागेवर जावून बसले. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला आणि सभागृताली आमदारांना यावेळी एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. याआधी एकत्र काम करणारे हे दोन नेते आज एकमेकांच्या विरोधात बसले होते.
विरोधी बाकांवर बसलेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उद्धव ठाकरे आणि अन्य सहा जणांनी घेतलेल्या मंत्री पदाच्या शपथविधीवर आक्षेप घेतला. मात्र यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पहिल्या भाषणातच विरोधकांना फटकारले आहे.