मुंबई; महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शनिवारी या ठाकरे सरकारची बहुमत चाचणी पार पडली. या चाचणीत ठाकरे सरकारने १६९ मत मिळवत ही बहुमत चाचणी जिंकली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत भाषण करत विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.
यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की, आयुष्यात पहिल्यांदाच सभागृहात आलो, सभागृहात आलो हे माझं भाग्यच आहे. सभागृहात येण्याचं दडपण होतं, मला सभागृहात कसं होईल याची चिंता होती, पण इथं आल्यावर कळलं मैदानातच चांगलं असतं. मोकळ्या मैदानात मी तलवारबाजी करणार नाही. मी समोरासमोर लढणारा आहे. शत्रूला अंगावरती घेणारा आहे. आता कोणी शत्रू नाही, तर राजकीय विरोधक आहेत.
तसेच देशात अनेक राज्य आहेत, त्यात आपला महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे. आता संपूर्ण देशही आपलाच आहे. हे दैवत ज्या मातीत जन्माला आलं, त्या मातीत जन्माला आलेल्या शिवरायांचे आम्ही भक्त आहोत. मी छत्रपती महाराजांची शपथ घेतली, मी माझ्या आईवडिलांची शपथ घेतली, हा जर गुन्हा असेल, तर तो एकदा नाही तर प्रत्येक जन्मात तो मी करेन, जो आईवडिलांना मानत नाही, तो पुत्र म्हणून जगायच्या लायकीचा नाही. विरोधकांशी सामना करणं हा आमचा अधिकार आहे. आम्हाला साधू, संत आणि समाजसुधारकांचा महाराष्ट्र अपेक्षित असल्याचंही ते म्हणाले आहेत.