मुंबई: राज्यात नव्याने स्थापन झालेल्या ठाकरे सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज पार पडला, हा ठराव ठाकरे सरकारने १६९ मतांनी जिंकला आहे. परंतु या वेळी विरोधकांनी शपथविधीवर आक्षेप घेत सभात्याग केला. त्यानंतर मात्र सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला आहे.
विरोधकांनी शपथविधीवर घेतलेल्या आक्षेपाबद्दल बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त मंत्री छगन भुजबळ म्हणाले कि, लोकप्रतिनिधी म्हणून शपथ घेताना संसदेपासून विधानसभेपर्यंत अनेक सदस्य आपापल्या दैवतांची नावं घेत असतात. त्याला आक्षेप घेऊन शपथविधी रद्द करायचा झाल्यास भविष्यात संसदच बरखास्त करावी लागेल. असं म्हणताच सभागृहात एकाच हश्या पिकला.
महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शपथविधी मुंबईतील शिवाजी पार्कवर २८ नोव्हेंबर रोजी पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत अन्य सहा मंत्र्यांनीही शपथ घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री व अन्य काही मंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व आई-वडिलांना स्मरण करून शपथ घेतली. त्याला आक्षेप घेऊन भाजपनं हा शपथविधी रद्द करण्याची मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडं केली होती. भाजपचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहातही हा मुद्दा मांडत. सभात्याग केला.
दरम्यान या आक्षेपांचा भुजबळांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ‘संसदेपासून विधानसभेपर्यंत अनेक लोकप्रतिनिधी शपथ घेताना ‘जय श्रीराम’ वगैरे म्हणतात. खरंतर ही नावे शपथ घेण्याच्या आधी किंवा नंतर घेतली जातात. शपथेचा मसुदा वाचताना तो सलग वाचला जातो, त्यात काही खंड पडत नाही. त्यामुळं त्याला आक्षेप घेण्याचं काही कारण नाही आणि आक्षेप घ्यायचाच झाला तर उद्या संसदच बरखास्त करावी लागेल,’ असं भुजबळ म्हणाले.