औरंजेबावरुन राज्यातील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. आधी अहमदनगर औरंगजेबाचे पोस्टर्स झळकावण्यात आले नंतर कोल्हापुरातील एका युवकाने स्टेटलसा ओरंगजेबाचा फोटो ठेवल्याचं म्हटलं जातंय. या दोन्ही घटनामुळे संतापलेल्या हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत निषेध मोर्चे काढले.
याच घडामोडींवर ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनातून टी करण्यात आली आहे. रस्त्यावर उतरून गृहमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयाची लक्तरे वेशीवर टांगतात याचा अर्थ काय? असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.
काय आहे सामनाच अग्रलेख
महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’च्या नावाने मोर्चे निघत आहेत व आता औरंगजेबास खांद्यावर बसवून हिंदुत्व खतऱ्यात आणल्याच्या आरोळ्या ठोकल्या जात आहेत. गाडलेल्या मुडद्यांमुळे हिंदुत्व खतऱ्यात यावे इतके ते कच्चे व लेचेपेचे नाही. लेचेपेचे आहे ते भाजपचे व मिंध्यांचे राजकारण. सरकार अपात्र ठरत आहे, ते कोसळणार आहे. त्यामुळे बुडत्यास काडीचा आधार तसा या बुडत्यांनी औरंगजेबाचा आधार घेतला असेल तर ते लाजिरवाणेच म्हणावे लागेल. तिकडे मणिपूर पेटले आहे ते यांना विझवता येत नाही. इथे महाराष्ट्र पेटवू पाहत आहेत. हा आगीशी खेळ त्यांना महाग पडेल. तो औरंग्या राहील बाजूला, पेटवापेटवी करणारेच त्या आगीत जळून जातील. हा इशारा आम्ही महाराष्ट्र हितासाठी देऊन ठेवीत आहोत.
औरंगजेबास महाराष्ट्रात दफन करून सवातीनशे वर्षे होत आली, पण गाडलेल्या औरंग्यास जिवंत करण्याचे उपक्रम महाराष्ट्रातील काही राजकीय पक्ष करीत आहेत. औरंगजेबावरून कोल्हापुरात दंगल झाली. स्वतःस हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या संघटनांनी रस्त्यावर उतरून राडा केला. हे का? तर एका तरुणाने त्याच्या मोबाईलवर स्टेटस म्हणून औरंगजेबाचे छायाचित्र ठेवले. याआधी नगरमध्ये एका मिरवणुकीत औरंग्याचे छायाचित्र कुणीतरी फडकवल्याचा आरोप झाला व तेथेही तणावाची स्थिती झाली. कोल्हापूर-नगर मार्गाने संपूर्ण महाराष्ट्रात दंगली पेटविण्याचे हे सुनियोजित तंत्र आहे. औरंगजेबाच्या नावाने स्टेटस ठेवणे वगैरे गोष्टी निमित्त आहेत.
कोल्हापूर आणि नगरसारख्या जिल्ह्यांना एक सामाजिक, राजकीय वारसा आहे. ही सहकार क्षेत्रातील महत्त्वाची स्थाने आहेत, पण याच जिल्ह्यांना धार्मिक कारणाने अस्वस्थ करायचे कारस्थान सुरू आहे. काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातच बहादूरशाह जफर याच्या फोटोलाच औरंगजेबाचा फोटो समजून एका दुकानाची तोडफोड करण्याचा प्रकार घडला होता.
आताही कोल्हापुरात ज्या तरुणाने मोगल राजाचा स्टेटस ठेवला तो नक्की औरंगजेब होता की टिपू सुलतान, याची माहिती पोलिसांकडे नाही. तरीही क्षणात शेकडो लोक रस्त्यावर उतरून गृहमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयाची लक्तरे वेशीवर टांगतात याचा अर्थ काय? विश्व हिंदू परिषद, बजरंग दल वगैरे संघटनांची ही तरुण पोरे होती व त्यातील बहुसंख्य पोरे ही कोल्हापूरच्या बाहेरून आली. एका रात्रीत संदेश देऊन त्यांना रस्त्यावर आणले गेले व हिंदुत्वाच्या नावाने त्यांची डोकी भडकवली गेली. औरंगजेब हे आता महाराष्ट्रातील राजकारणाचे नवे हत्यार झालेले दिसते. कर्नाटकात बजरंगबलीची गदा जाहीर सभांत फिरवूनही भाजपचा
दारुण पराभव
झाला. त्यामुळे महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर खोदण्याचे काम सुरू झाले आहे. हिंदुत्व नासवण्याचा आणि विकृतीकडे नेण्याचा हा प्रकार आहे. महाराष्ट्रात ठाकरे सरकार असताना देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाची कबर खणून कायमची विल्हेवाट लावण्याची भाषा केली. आता तर त्यांचेच सरकार आले व कबर जागेवर आहे आणि त्याच औरंगजेबाच्या मदतीने त्यांचे राजकारण सुरू आहे. हैदराबादचे ओवेसी बंधू छत्रपती संभाजीनगरात येतात व औरंग्याच्या कबरीसमोर नमाज पठण करतात.
महाराष्ट्रावरील हा आक्रमक एखाद्याचे श्रद्धास्थान ठरू शकत नाही. औरंग्याने महाराष्ट्रात धर्मांतरे केली, देवळे उद्ध्वस्त केली, शिवरायांना नजरकैद केले, त्या औरंग्याच्या छाताडावर पाय रोवून छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. दोन दिवसांपूर्वीच रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा लाखोंच्या गर्दीत साजरा झाला व त्या सोहळ्याचे ढोल-नगारे, तुताऱ्या, रणशिंग वाजत असतानाच कोल्हापुरात औरंग्याच्या नावाने दंगल घडवली गेली.
औरंग्यास जिवंत करून शिवरायांच्या इतिहासावर माती टाकण्याचे हे काम कोण करीत आहे? औरंग्या व टिपू सुलतानचा ‘महाराष्ट्र धर्मा’शी काडीमात्र संबंध नाही. प्रतापगडाच्या पायथ्याशी खोदलेली अफझलखानाची कबर, औरंग्याची कबर, लाल महालात तोडलेली शाहिस्तेखानाची बोटे हा मावळय़ांच्या शौर्याचा इतिहास आहे. या कबरी महाराष्ट्राचा स्वाभिमान व हिंदुत्वासाठी दाखवलेल्या शौर्याचे प्रतीक आहेत. महाराष्ट्राशी दुश्मनी घेणाऱ्यांना आपण बजावतो, ‘‘आमच्यावर चाल करून येण्याआधी औरंगजेब आणि अफझलखानाची कबर पाहून या व मगच महाराष्ट्राच्या वाटेला जा!’’ पण आज सत्तेवर बसलेल्या मिंधे गटाच्या एका
अकलेच्या कांद्याने
असे जाहीर केले की, ते म्हणे पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून मागणी करीत आहेत की, ‘संभाजीनगर शहरातून औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी.’ औरंगजेबाची कबर हटवण्याची नौटंकी करण्यापेक्षा त्या कब्रस्तानाचे जे राजकीय उदात्तीकरण सुरू आहे त्यावर सरकारने बंदी घालावी. जे ओवेसी बंधू हैदराबादेतून संभाजीनगरमध्ये येऊन औरंग्याच्या कबरीसमोर नमाज पढतात ते ओवेसी व त्यांचा पक्ष मोदी पक्षाचा अंतःस्थ मित्र आहे. उत्तर प्रदेशपासून अनेक राज्यांत विजय मिळवण्यासाठी ओवेसी पक्षास राजकीय सुपाऱ्या दिल्या जातात.
मुसलमानांची मते फोडणारे यंत्र म्हणून त्यांचा वापर केला जातो हे काही लपून राहिलेले नाही. ओवेसी यांनी धर्मांध तणाव निर्माण करावा ही तर भाजपची इच्छा आहे व तसे उद्योग घडवले जात आहेत. महाराष्ट्रात औरंगजेबाच्या नावाने लागलेल्या आगी त्याच कारस्थानाचा भाग आहेत. औरंग्यास जिवंत केल्याशिवाय भाजप-मिंधे सरकारच्या मुडद्यात जान फुंकली जाणार नाही.
महाराष्ट्रात काही दिवसांपासून ‘लव्ह जिहाद’च्या नावाने मोर्चे निघत आहेत व आता औरंगजेबास खांद्यावर बसवून हिंदुत्व खतऱ्यात आणल्याच्या आरोळ्या ठोकल्या जात आहेत. गाडलेल्या मुडद्यांमुळे हिंदुत्व खतऱयात यावे इतके ते कच्चे व लेचेपेचे नाही. लेचेपेचे आहे ते भाजपचे व मिंध्यांचे राजकारण. महाराष्ट्रातील इतर प्रश्नांवरचे लक्ष विचलित करण्यासाठीच औरंगजेबाचा मुडदा उकरला जात आहे.
सरकार अपात्र ठरत आहे, ते कोसळणार आहे. त्यामुळे बुडत्यास काडीचा आधार तसा या बुडत्यांनी औरंगजेबाचा आधार घेतला असेल तर ते लाजिरवाणेच म्हणावे लागेल. तिकडे मणिपूर पेटले आहे ते यांना विझवता येत नाही. इथे महाराष्ट्र पेटवू पाहत आहेत. हा आगीशी खेळ त्यांना महाग पडेल. तो औरंग्या राहील बाजूला, पेटवापेटवी करणारेच त्या आगीत जळून जातील. हा इशारा आम्ही महाराष्ट्र हितासाठी देऊन ठेवीत आहोत.