वाराणसी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदीय मतदारसंघ वाराणसी (काशी) येथील गंगा घाटांवर बिगर हिंदूंच्या प्रवेशावर बंदी घालणारे पोस्टर लावण्यात आले आहेत. हे पोस्टर्स विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने लावले आहेत. काशीच्या गंगा घाटांव्यतिरिक्त आणखी मंदिरांमध्ये अशी पोस्टर्स लावण्याचा त्यांचा विचार आहे. सध्या पोलीस या प्रकरणी बोलण्याचे टाळत आहेत. मात्र, पोलिसांकडून ही पोस्टर्स हटविण्याचे काम सुरू आहे. दुसरीकडे, बजरंग दल काशी महानगर संयोजक निखिल त्रिपाठी ‘रुद्र’ म्हणतात की, आता हिंदू समाजाला आपली ताकद दाखवून धर्म आणि समाजाच्या रक्षणासाठी पुढे यावे लागेल. सर्व काही सरकारवर सोडता येणार नाही. मंदिरात किंवा गंगेच्या घाटाच्या काठी कुठेही विधर्मी प्रवेश करेल, त्याला जागीच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल.
हे पोस्टर्स विहिंप आणि बजरंग दलाच्या वतीने पंचगंगा घाट, रामघाट, मणिकर्णिका घाट, दशाश्वमेध ते काशीतील लगायत अस्सी घाटापर्यंत लावण्यात आले आहेत, ज्यामध्ये गंगा घाटावर बिगर हिंदूंना प्रवेश बंदी असल्याचे स्पष्टपणे लिहिले आहे. हे पोस्टर्स लावल्यानंतर आता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने संपूर्ण काशीतील मंदिरांमध्ये असे पोस्टर्स लावण्याचे सांगितले आहे. विहिंपचे महानगर मंत्री राजन गुप्ता म्हणतात की, मंदिर आणि गंगाघाट हे सनातन धर्माच्या लोकांचे श्रद्धेचे ठिकाण आहे, इथे इतर धर्माच्या लोकांचे काय काम आहे? धर्माच्या रक्षणासाठी हे केले जात असल्याचे विश्व हिंदू परिषदेचे महानगर अध्यक्ष कन्हैया सिंह यांनी सांगितले.
दरम्यान, गंगा घाट आणि वाराणसीच्या अनेक मंदिरांमध्ये असे बॅनर लावण्याबाबत समाजवादी पक्षाकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. समाजवादी पक्षाने हे भाजप आणि विश्व हिंदू परिषदेचे धार्मिक ध्रुवीकरणाचे षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे. महामृत्युंजय मंदिर परिवाराशी संबंधित असलेले आणि समाजवादी पार्टी युवाजन सभेचे जिल्हाध्यक्ष किशन दीक्षित म्हणतात की, वाराणसीमध्ये लोक सर्व धर्मांच्या धार्मिक स्थळांचा आदर करतात. साधारणपणे कोणीही मुस्लिम मंदिरात जात नाही किंवा हिंदू मशिदीत पोहोचत नाही. मग असे बॅनर लावणे अयोग्य आहे. सपा नेत्याचे म्हणणे आहे की, भाजपकडे कोणताही मुद्दा उरला नाही, त्यामुळे आता धार्मिक ध्रुवीकरण करून समाजातील वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.