लखनौ-उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी गुरुवारी मतदान होणार आहे. या टप्प्यात 57 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. या टप्प्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह कॉंग्रेस नेते अजयकुमार लल्लू आणि समाजवादी पार्टीचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासारख्या बड्या नेत्यांचे भवितव्य ठरणार आहे.
उत्तर प्रदेशातील 403 पैकी 292 मतदारसंघांमधील मतदान आतापर्यंत पूर्ण झाले आहे. आता पूर्वांचलमधील मतदान होणे बाकी आहे. या भागात विधानसभेच्या 11 जागा आहेत. यापैकी 57 जागा एकूण 10 जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या आहेत. या 57 ठिकाणी उद्या मतदान होणार आहे. तर उर्वरित 54 जागांसाठी अकेरच्या टप्प्यात मतदान होणार आहे.
उद्या आंबेडकरनगर, बलरामनगर, सिद्धार्थनगर, बस्ती, संत कबीर नगर, महाराजगंज, गोरखपूर, कुशीनगर, देवरिया आणि बलिया या जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. या 57 जागांपैकी 11 जागा आरक्षित आहेत. या 57 पैकी 46 जागांवर भाजपने 2017 च्या निवडणुकीत विजय मिळवला होता. त्यामुळे या जागा भाजपसाठी आताही महत्त्वाच्या असणार आहेत.
या 57 जागांवर 676 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रथमच गोरखपूरमधून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. तर भाजपचे दिवंगत नेते उपेंद्र दत्त शुक्ला यांच्या पत्नीला आदित्यनाथ यांच्याविरोधात समाजवादी पार्टीने रिंगणात उतरवले आहे.
राज्यातील विरोधी पक्षनेते आणि समाजवादी पार्टीचे नेते राम गोविंद चौधरी हे बन्सदिह येथून निवडणूक लढवत आहेत. या टप्प्यातील निवडणुकीत अनेक मंत्र्यांचेही भविष्य ठरणार आहे. त्यामध्ये सूर्यप्रताप शाही, सतिशचंद्र द्विवेदी, जयप्रताप सिंह, श्रीराम चौहान आणि जयप्रकाश निसाद यांचाही समावेश आहे.