जालौन (उत्तर) – ज्याला कुटुंबच नाही त्या व्यक्तीला कुटुंबाची दु:खे काय समजणार, अशा शब्दांत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज येथील सभेत पंतप्रधान मोदींवर आणि योगींवर त्यांचे नाव न घेता निशाणा साधला.
भाजपच्या नेत्यांनी समाजवादी पक्षावर घराणेशाहीचा आरोप करीत टीका सुरू केली आहे. त्याला उत्तर देताना त्यांनी हा पलटवार केला. ते म्हणाले की, ज्यांना कुटुंबच नाही त्या लोकांना महागाई, बेकारी हे प्रश्न समजू शकत नाहीत. कारण त्यांना त्याच्याशी काही देणेघेणे नसते. अशा लोकांच्या हातात आपण सत्ता देणे म्हणजे आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशातील जालौन येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना अखिलेश म्हणाले, भारतीय जनता पक्षाने येथील सामान्य जनतेवर अनेक प्रकारची संकटे आणली. त्यांनी नोटबंदीच्या काळात गरिबांना बॅंकेत पैसे भरण्यास भाग पाडले आणि गरिबांनी बॅंकेत ठेवलेले पैसे त्यांचे उद्योगपती मित्र घेऊन पळून गेले.
काही दिवसांपूर्वी 22 बॅंकांचे सुमारे 23 हजार कोटी रुपये घेऊन एक उद्योगपती पळून गेला. अशा प्रकारचे हे पहिलेच उदाहरण नाही तर देशातील बॅंकांना चुना लाऊन अनेक उद्योगपतींनी विदेशात पलायन केले आहे. या पळालेल्या उद्योगपतींवर कारवाई का होत नाही, असा सवालही त्यांनी केला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आमची गरमी काढण्याची भाषा केली, पण पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदानाचे कौल पाहिल्यानंतर त्यांच्यातील गरमी कमी झालेली दिसते आहे, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली.