नवी दिल्ली : गुजरातमध्ये काल झालेल्या अवकाळी पावसामुळे (Heavy rain) जनजीवन विस्कळीत झाले. अतिवृष्टीमुळे २० जणांना जीव गमवावा लागला. या सर्व २० जणांचा वीज पडून मृत्यू झाल्याची माहिती सरकारने दिली आहे. यासोबतच मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. अतिवृष्टीमुळे ४० गुरेही दगावली आहेत. (Gujrat News)
मुसळधार पावसाचा सर्वाधिक परिणाम गुजरातमधील अमरेली, सुरेंद्रनगर, मेहसाणा, बोताड, पंचमहाल, खेडा, साबरकांठा, सुरत आणि अहमदाबाद जिल्ह्यांमध्ये झाला आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाबरोबरच ताशी ५० किलोमीटर वेगाने वारेही वाहत आहेत. (Weather update)
केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी रात्री ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, गुजरातच्या विविध शहरांमध्ये खराब हवामान आणि वीज पडून अनेक लोकांच्या मृत्यूच्या वृत्ताने मला खूप दुःख झाले आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या नुकसानाबद्दल मी शोक व्यक्त करतो. स्थानिक प्रशासन मदतकार्यात गुंतले आहे. जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो.
हवामान खात्याने सांगितले की…
सोमवारी कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. रविवारी गुजरातच्या २५२ पैकी२३४ तालुक्यांमध्ये पाऊस झाला. सुरत, सुरेंद्रनगर, खेडा, तापी, भरूच आणि अमरेली जिल्ह्यात १६ तासांत ५०-११७ मिमी पावसाची नोंद झाली, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आणि पिकांचे नुकसान झाले.
राजकोटच्या काही भागात गारपीट झाली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पावसामुळे पिकांच्या नुकसानाव्यतिरिक्त, सौराष्ट्र विभागातील मोरबी जिल्ह्यातील कारखाने बंद झाल्यामुळे सिरॅमिक उद्योगावरही परिणाम झाला आहे. आयएमडीच्या अहमदाबाद केंद्राच्या संचालक मनोरमा मोहंती यांनी सांगितले की, सोमवारी पाऊस कमी होईल आणि दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्र जिल्ह्यांतील काही भागांमध्ये तो केंद्रित होईल.