मुंबई : राज्यावर सध्या करोनाचे संकट घोंगावत असताना मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह विदर्भात पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसासह झालेल्या गारपीटीमुळे मोसंबी, आंबा, डाळिंब, द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे.
तर, गहू, हरभरा, मका अशा रब्बी पिकांनाही याचा फटका बसला आहे. यात वाशिम, यवतमाळ, परभणी, जालना, जळगाव, अमरावती, वर्धा, धुळे, हिंगोली, औरंगाबाद या जिल्ह्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांना अवेळी येणाऱ्या पावसाचा सातत्याने सामना करावा लागत आहे. मागील आठवड्यात मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात शेतीमालाचे नुकसान झाले होते.
त्या संकटातून बाहेर पडत असताना पावसाने पुन्हा एकदा तडाखा दिला आहे. यात बऱ्याच ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट झाल्याने फळबागांना फटका बसला आहे.
अमरावती जिल्ह्यात अनेक तालुक्यात गारपीटसह मुसळधार अवकाळी पाऊस बरसला. आज सकाळी तिवसा तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली.
अंजनगाव सुर्जी, चांदूरबाजार तालुक्यामधे वादळी वाऱ्यासह गारपीटमुळे केळी, गहू, संत्रा, हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले. तर, वाशिम जिल्ह्यात पुन्हा एकवेळा पावसाने हजेरी लावली. काही दिवसांपूर्वी हवामान खात्याने अंदाज व्यक्त केल्याप्रमाणे जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात जोरदार पाऊस झाला.
वर्धा जिल्ह्याच्या वर्धा, आर्वी, आष्टी, कारंजा, देवळी, समुद्रपूर, देवळी, सेलू तालुक्याला अवकाळी पावसासह वादळाचा तडाखा बसला. तर धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरासह तालुक्यात अर्धा तास वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. परभणी जिल्ह्यात सेलु, पाथरी, परभणी तालुक्यात वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला.