मांडवगण फराटा(प्रतिनिधी) : अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे शिरूर तालुक्यातील आंधळगाव शिवारात २२ मेंढ्या व २ कोकरांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (2 डिसेंबर)सकाळी घडली.यात मेंढपाळांचे तब्बल २ लाख ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शिरूर तालुक्यातील पुर्व भागात बुधवारी काही प्रमाणात अवकाळी पाऊस सुरू झाला. याचा फटका मेंढपाळांनाही बसला आहे.
चाऱ्याचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर दरवर्षी दौंड व बारामती भागातील मेंढपाळ लगतच्या शिरुर तालुक्यात मेंढ्या चारण्यासाठी जात असतात. आनंदा पिंगळे (रा.भांडगाव ता.दौंड व राजेंद्र कोकरे (रा.चौफुला ता.दौंड) हे मेंढपाळ काही दिवसांपूर्वी मेंढ्या घेऊन शिरूर तालुक्यात आले होते. ते आंधळगाव येथील मोकळ्या शेतात मुक्कामी होते.
मात्र, निसर्गाच्या अवकृपेमुळे झालेल्या अवकाळी पावसाने व थंडीने २२ मेंढ्या व २ कोकरांचा मृत्यू झाला आहे. मृत मेंढ्या व कोकरांचा संख्येत वाढ होण्याची शक्यता असल्याचे मेंढपाळ राजेंद्र कोकरे यांनी सांगितले.
दरम्यान, माहिती मिळताच आंधळगावचे तलाठी सतिश पलांडे,महसूल कर्मचारी जयकुमार कुसेकर, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ.पी.एल रोकडे,पोलिस पाटील चंद्रकांत कुसेकर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.यावेळी आंधळगाव सोसायटीचे अध्यक्ष गोरक्ष ओव्हाळ,सोशल मिडीयाचे संतोष खरात,ज्ञानेश्वर सोनवणे,माणिक सरोदे,अमोल कुसेकर यांनी संबंधित शेतकऱ्यांना मदत केली.