नागपूर – येथे सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन ( Hiwali adhiweshan ) सुरु आहे. या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसावर चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. उद्या म्हणजे सोमवार ११ डिसेंबर रोजी विधानसभेत अवकाळी पावसावर चर्चा होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ( Rahul narvekar ) हे या चर्चेचा निर्णय देणार आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ( Vijay wadettiwar ) यांनी या चर्चेची मागणी केली होती. त्याच प्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit pawar ) यांनी देखील या मुद्द्यावर चर्चा करण्याची तयारी दाखवली होती. या चर्चासत्रामध्ये विरोधक अनेक मुद्द्यांवर सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे.
राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा सोमवारी तिसरा दिवस आहे. दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये घमासान झाल्याचे पाहायला मिळाले. नवाब मलिकांच्या मुद्द्यामुळे हिवाळी अधिवेशाचे पहिले दोन दिवस अत्यंत गाजले. परंतु आता अधिवशेनाच्या तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा केली जाणार आहे. दरम्यान प्रश्नोत्तराच्या तासानंतर अवकाळीच्या मुद्द्यावर ही अल्पकालीन चर्चा होईल. या चर्चेमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचा कोणता निर्णय घेतला जाणार हे पाहणे जास्त महत्त्वाचे ठरेल.
राज्यातील शेतकऱ्यांवर यंदाच्या वर्षात एकामागून एक संकट येतच गेली. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले त्यानंतर दुष्काळ, पुन्हा गारपीटीसह आलेला अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर ७५ टक्क्यांपेक्षा अधिक भागात दुष्काळसदृश्य परिस्थिती असली तरीही अनेक भागात शासनाकडून दुष्काळ जाहीर करण्यास शासनाकडून विलंब होत आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत १ हजार २२८ महसूल मंडळात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पण तरीही अनेक तालुक्यांचा या यादीमध्ये समावेश नाही, असे देखील विरोधकांचे म्हणणे आहे.
मराठा आरक्षणावरही होणार चर्चा
मराठा समाजाला आरक्षण ( Maratha reservation ) देण्यासाठी हिवाळी अधिवेशना दरम्यान सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे यावर सभागृहात चर्चा करण्यासाठी सरकारची देखील तयारी असल्याचे पाहायला मिळत आहे. यावर सोमवारी किंवा मंगळवारी सभागृहात मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावर चर्चा होणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. उदय सामंत म्हणाले, मराठा आरक्षणासंदर्भात मी ज्यावेळी मनोज जरांगे यांना भेटलो होतो, त्यावेळी मराठा आरक्षणाबाबत सभागृहात चर्चा होईल असे आश्वासन दिले होते. त्यामुळे ती चर्चा सोमवारी किंवा मंगळवारी सभागृहात होणार आहे.