नगर – शहराला आज पुन्हा एकदा पावसाने झोडपले. सावेडी, केडगाव उपनगरांत गारांसह पाऊस कोसळला. दुपारच्या दरम्यान पावसाला सुरवात झाली. त्यानंतर सुमारे एक तास जोरदार पाऊस झाला. वीजपुरवठाही खंडित होता. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. नगर शहरासह जिल्ह्याला गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा तडाखा बसत आहे. अवकाळी पावसामुळे कांदा, गहू, त्याचबरोबर इतर पिकांचे नुकसान झाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसान भरपाईच्या पंचनाम्यांचे आदेश दिले. मात्र, शासकीय सुट्या आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईमुळे अद्याप काही ठिकानचे पंचनामे झालेले नाहीत. परिणामी, शेतकऱ्यांच्या हातात नुकसान भरपाईचा एकही रुपया पडलेला नाही. आज पुन्हा एकदा शेतकऱ्यांसह नगरकरांना गारपिटीला तोंड द्यावे लागले. झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे व्हावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या पिकांचे झाले नुकसान
गेल्या काही दिवसापासून अवकाळी पाऊस होत असून या पावसात सर्वाधिक नुकसान मका, कांदा, वाटाणा, कलींगड, टोमॅटो, आंबा, झेंडू, उन्हाळी बाजारी, उन्हाळी सोयाबी, कांदा, गहू, केळी, डाळींब या पिकाचे नुकसान झाले असून यातील अनेक पिके ही शेतकर्यासाठी नगदी पिके आहेत. विशेष करून कांदा, डाळींब, केळी या पिकांच्या लागवडीसाठी आणि संवर्धनासाठी शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. नेमकी याच पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.
पाणीपुरवठा विस्कळित
शहरात पावसाला सुरवात होताच बहुतांश भागात वीजपुरवठा खंडित झाला. खंडित वीजपुरवठ्याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावरदेखील झाला. शहराला शनिवारी रोटेशननुसार होणारा पाणीपुरवठा एक दिवस उशिरा करण्यात येणार आहे.