उन्हाळ्याच्या सुट्टीत बाळू, शमी मामाच्या गावी छान रमून गेले होते. त्यांच्या राज्यात रोजच काहीतरी नवीन घडायचं. मज्जाच मज्जा रोजची. आज सोमवारचा दिवस होता. मामाची मुलं आणि बाळू, शमी सगळी गॅंग गावच्या वेशीजवळ असलेल्या वडाच्या झाडाकडे सूरपारंब्या खेळायला मामा मामीला सांगून सकाळीच निघाले होते. इकडे वडाजवळ असलेल्या देवळाजवळच्या परिसरात भाविकांबरोबरच त्यांची मुलंबाळं, हारफुलेवाले, नारळ, प्रसादाचे पेढे विकणारे, मुलांसाठी खेळणी, गारीगार विकणारे… केवढी गर्दी व्हायची तिथं.
पण आजच्या या गर्दीत एक वेगळाच माणूस सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता. त्याच्याकडे विकायला हारतुरे नव्हते की मुलांसाठी खेळणी नव्हती. पण मुलं मात्र त्याच्याजवळ गर्दी करून होते. कारण त्याच्याकडे नाना रंगांचे, लहान मोठ्या आकाराचे आणि विविध प्रकारचे पक्षी होते विकायला. पक्ष्यासांठी त्याच्याकडे मोठ्ठाले चार पिंजरे होते. खेळून देवळाकडं येण्यासाठी निघालेल्या बाळूचं अचानक लक्ष त्या पक्षी विकणाऱ्याच्या पिंजऱ्याकडे गेले.
नाना रंगांचे पक्षी पाहून बाळू एकदम हरखला पण दुसऱ्याच क्षणी त्या पक्ष्यांना पिंजऱ्यात डांबलेले पाहून तो हळहळला. मग मनाशी काही पक्कं करून तो त्या पिंजऱ्याकडे वळला. त्या पक्षी विकणाऱ्याच्या जवळ जाताच पक्ष्यांचा किलबिलाट एकदम वाढलाय असं बाळूला वाटलं. जणू हे पिंजऱ्यातील पक्षी बाळूला सांगतात की, “आम्हाला या माणसाच्या तावडीतून सोडव रे बाळू…’
“ये पोरा, कोणतं पाखरू देऊ रे तुला? पोपट देऊ की, कोकीळ? की हा पारवा देऊ? असं कर, तू ही चिमणीच ने, अवघी वीस रूपयाला. बोल चटचट.’ पक्षी पाहण्यात गुंग झालेला बाळू भानावर आला आणि पटकन त्या माणसाला म्हणाला, “त्या पक्ष्यांना नका पिंजऱ्यात डांबू. त्या निष्पाप जीवांना जाऊ द्या त्यांच्या घरी.’ पक्षी विकणाऱ्याने रागानेच त्याला हुसकावून लावले. बाळू तेथून निघून गेला. देवळातले त्याचे मित्रमंडळी प्रसाद घेऊन बाहेर आले. बाळूजवळ पोहचले. बाळूने घडलेली घटना मित्रांना सांगितली. त्यांनी मग त्या पक्षी विकणाऱ्याचे घर शोधून काढण्याचा निर्णय घेतला.
गर्दी कमी झाली तसा पक्षी विकणारा खांद्यावरील दांडीवर पिंजरे लटकवून घराकडे निघाला. दबा धरून बसलेले बाळू व त्याचे मित्रमंडळ हळूहळू अंतर राखून त्या पक्षी विकणाऱ्याच्या मागे मागे जाऊ लागले. गावाबाहेर दूरवर एक जंगल होते. तो माणूस जंगलाच्या दिशेने निघाला. जंगलात एक खोपटं लागलं. त्या खोपटाच्या बाजूलाच आंब्याचं एक मोठ्ठं झाड होतं. त्या झाडाच्या फांद्यांना त्या माणसाने सगळे पिंजरे लटकवले. तो घरात शिरला. बाळूने मित्रांना लांबच थांबण्याचा इशारा केला आणि तो पावलांचा आवाज न करता हळूहळू पिंजरे लटकवलेल्या झाडाकडे गेला.
मग सरसर झाडावर चढून त्याने पटापट सर्व पिंजऱ्याची दारं उघडली आणि मग भरभर खाली उतरला. पाखरांच्या आवाजाने तो माणूस बाहेर आला. रिकामे पिंजरे पाहून हतबल झाला. त्याने पळणाऱ्या बाळूला लांबूनही ओळखले. बाळू जीवाच्या आकांताने पळत सुटला. आता तो माणूस बाळूच्या मागे दातओठ खाऊन पळायला लागला. बाळू गावच्या वेशीपर्यंत आला. त्या माणसाने धावत येऊन बाळूचे मागून मानगूट पकडले. तो त्या माणसाला म्हणाला, “रागवू नका. मी तुमचे झालेले सगळे नुकसान भरून देतो. जवळच माझ्या मामाचे घर आहे. चला तेथे.’
बाळू मामाच्या घरी पोहचला. तो माणूस पटकन म्हणाला, “ह्या मुलानं माझी सगळी पाखरं पिंजऱ्यातून हुसकावून दिली बघा. मोठं नुकसान केलंय माझं. जंगलात जाऊन पाखरं पकडायची आणि ती विकायची हा पिढीजात धंदा आमचा.’ बाळूने मग मामाला घडलेलं सारं काही नीट सविस्तर सांगितलं. आपणच यांच्या पिंजऱ्यातील सर्व पाखरांना मुक्त केले हेही त्याने कबूल केले. मामा त्या माणसाला प्रेमाने म्हणाला, “देतो तुमचे मी पैसे. नका काळजी करु.या घरात या. आधी चहापाणी घ्या. त्या प्रेमळ शब्दाने त्याचा राग कुठले कुठे पळाला.’ तो म्हणाला, “नको नको, इथं हाय मी. ते बेस हाय.’ मामाने आग्रह गेला. मामाने विचारले, “किती नुकसान झालेय तुमचे.
तो म्हणाला, “माझी सगळी पाखरं अडीच हजाराची होती बघा. पण तुम्ही भली माणसं आहात. मला दोन हजार दिले तरी चालतील.’ मामाने त्याला अडीच हजारच दिले. म्हणाले, “राहू द्या. ठेवा. घरी कोण कोण असतं तुमच्या? कुठं राहता?’ तो माणूस त्याची कहाणी सांगायला लागला, “राहायला घर न्हाय. कसायला शेती न्हाय. पाखरं पकडतो आणि ती विकतो. त्यातून जे चार पैसे मिळतात. त्यावरच घरची गुजरान करतो.’ बाळू पटकन मध्येच म्हणाला, “मी एक बोलू का? जर माणसाला स्वतःला, स्वतंत्रता हवी मग पक्षी प्राण्यांना, का तो पिंजऱ्यात ठेवी? कृपा करून सांगतो,
तुम्ही पाखरांना पकडून विकू नका. त्यांनाही स्वतःचं अस्तित्व आहे. आपण जगूया त्यांनाही जगवूया. तुम्ही दुसरा कोणताही व्यवसाय करा.’ हे सारं ऐकून तो माणूस अगतिकपणे म्हणाला, “दुसरा कोणता उद्योग करू? इथं हात आहेत पण हाताला कुणी काम देत नाही, अशी अवस्था झालीय माझी.’ मामा पटकन म्हणाला, “मी देतो काम. कराल माझ्या शेतात कष्ट? शेताजवळ माझं दुसरं घर आहे तिथं राहा तुम्ही खुशाल तुमच्या कुटुंबासह. शेती कसा. तुमच्या मुलाला शाळेत पाठवा. तोही आमच्या बाळूसारखा शाळा शिकून हुशार होईल बघा.’ तो माणूस पटकन म्हणाला, “लय उपकार झाले बघा. माझी चूक मला उमगली. पाखरांना या मुलानं सोडून दिलं. आता मी हे पैसे सोडून देतो. नकोय मला हे पैसे. काय रे पोरांनो, झाली ना फिट्टमफाट?’ आता सारं घरच हसरं झालं.
– एकनाथ आव्हाड