मुंबई – सर्व विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनींची सुरक्षितता महत्त्वाची असून छेडछाडमुक्त, सायबरमुक्त परिसर राहिण्यासाठी महिलांच्या सुरक्षिततेच्यासंदर्भात सर्वसमावेशक अशी नियमावली तयार करणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
विधानभवनात राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालये परिसरात विद्यार्थिनींच्या छेडछाडीच्या तक्रारींच्या अनुषंगाने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती.
पुढे मंत्री उदय सामंत म्हणाले की, विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी असलेले नियम, कायद्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे. 90 दिवसांचा कालावधी गृहित धरुन ही नियमावली तयार करण्यात यावी. यामध्ये शहरी भाग, छोटी शहर, ग्रामीण भाग, या परिसरातील शैक्षणिक संस्थांचा अभ्यास करुन सर्वसमावेशक अशी नियमावली तयार करावी. ही नियमावली खासगी महाविद्यालये, विद्यापीठांनासुद्धा लागू राहील. तसेच विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी मोबाईल ॲप तयार करावे. संबंधित महाविद्यालयांचे प्रमुख, विद्यार्थी-विद्यार्थिनी, त्यांचे पालक यांचा समावेश असेल यामुळे या अशा प्रवृत्तीला आळा घालण्यास मदत होईल, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.
महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत नियमांचे कठोर पालन करावे – डॉ.नीलम गोऱ्हे
महाविद्यालयीन विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरणात शिक्षण घेता आले पाहिजे. यासाठी सर्व विद्यापीठ व महाविद्यालयांतील विद्यार्थिनींची सुरक्षा ही संबंधित शैक्षणिक संस्थांची जबाबदारी आहे. शैक्षणिक परिसर, वसतिगृह, ग्रंथालय, उपहारगृहे तसेच ऑनलाईन शिक्षणामुळे सायबर सुरक्षेबाबत पुरेशा उपाययोजना करुन सुरक्षिततेबाबत नियमांचे कठोर पालन करावे, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले.
बैठकीमध्ये कुलसचिव, महिला सुरक्षिततेसाठी काम करणाऱ्या संघटनांचे महिला प्रतिनिधी यांनी विद्यार्थिनींच्या अडचणी, तक्रारींनंतर मिळणारा प्रतिसाद, महाविद्यालयांची कार्यवाही, महाविद्यालयीन परिसरात सीसीटीव्ही, स्थानिक पोलीस प्रशासनाचा प्रतिसाद, महाविद्यालयांमध्ये सुरक्षिततेबाबत केलेल्या उपाययोजना याबाबत सविस्तर चर्चा केली.