सोलापूर – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भविष्यात पंतप्रधान पदाच्या खुर्चीला न्याय देतील, असे मत आमदार शहाजी पाटील यांनी रविवारी व्यक्त केले. गडकरींच्या नेतृत्वावर भाष्य करताना त्यांनी सध्या देशाला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची गरज असल्याचेही स्पष्ट केले आहे.
त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये वंचित आणि शिवसेनेच्या युतीमुळे वाद निर्माण झाला असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
येथे एका मराठी वृत्त वाहिनीशी बोलताना आमदार शहाजी पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे. पाटील पुढे म्हणाले, भाजप आणि पंतप्रधान मोदींच्या कारभाराबाबत जनता समाधानी आणि सुखी आहे. त्यामुळे शरद पवारांनी यासंबंधी केलेले विधान मला मान्य नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्रंदिवस जनतेसाठी कष्ट करत असल्याचेही, त्यांनी यावेळी त्यांनी म्हटले.
तत्व सोडून युती
शिवसेना आणि वंचित बहूजन आघाडीची युती ही तत्व सोडून झाली आहे. आगामी निवडणुका कशा लढवाव्यात यासाठी त्याचे हे केविलवाणे प्रयत्न सुरू असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. तर राजकारणात वारस हा विचारांचा ठरत असतो. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा खरा वारसा हा मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडेच आहे, असे म्हणत त्यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले.