नवी दिल्ली – देशात करोनावरील लस येत्या वर्षी पहिल्या तीन-चार महिन्यांत उपलब्ध होणार असून जनतेला तातडीने पुरवठा करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली आहे. तसेच त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व जनतेला ही लस पुरवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, पुढील वर्षाच्या पहिल्या तीन ते चार महिन्यांत देशातील जनतेला लसीचा पुरवठा करण्यात आपण सक्षम असू. त्यानंतर जुलै आणि ऑगस्टमध्ये 25 ते 30 कोटी जनतेला लस पुरवण्याची योजना आम्ही आखली आहे.
करोनाविरुद्धच्या लढ्याला लवकरच अकरा महिने पूर्ण होतील. तेव्हापासून, स्वतःचे आणि इतरांचे संरक्षण करण्यासाठी स्वच्छता आणि सामाजिक अंतरांच्या मूलभूत तत्त्वांचे अनुसरण केले. कोविड विरूद्ध लढा देताना मास्क आणि सेनेटायझर आमचे मुख्य शस्त्र असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, दिल्लीतील बुरारी येथील निरंकारी समागम मैदानावर आंदोलन करत असलेल्या शेकडो आंदोलकांना आवाहन करताना डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, माझी सर्वांना विनंती आहे की त्यांनी कोविडचे नियम लक्षात ठेवावेत तसेच त्यानुसार वर्तन करावे. यामध्ये तोंडाला मास्क लावणे आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. आपल्या आरोग्यासाठी ही महत्त्वाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.