नवी दिल्ली : केंद्र सरकारने सर्वसामान्यांना एकापाठोपाठ दोन सुखद धक्के दिले आहेत. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ केल्यानंतर आता आणखी एक मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारने देशातील कोट्यवधी लोकांनी उज्ज्वला योजनेचा उपयोग करून घेतला आहे. या योजनेअंतर्गत सिलिंडरवर सबसिडी सरकरकडून जाहीर करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक मंत्रिमंडळाच्या बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या अनुदानाची मुदत आणखी एक वर्षाने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
देशातील 9.60 कोटी लाभार्थ्यांना आता आणखी एक वर्षासाठी प्रति सिलिंडर 200 रुपये सबसिडी मिळणार आहे. तसेच लाभार्थी अनुदानावर 12 सिलिंडर घेऊ शकणार आहेत. त्यामुळे याचा फायदा देशातील कोट्यवधी कुटुंबाना होणार आहे.
या निर्णयाविषयी अनुराग ठाकूर यांनी माहिती दिली. “२०२२ मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एका वर्षात १२ सिलिंडर आणि एका सिलिंडरवर २०० रुपये सबसिडी (अनुदान) देण्याचा निर्णय घेण्यात आला असून आंतरराष्ट्रीय किमतीत कोणताही मोठा बदल नसल्यामुळे ही सबसिडी आणखी एक वर्ष वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” असे ठाकूर यांनी म्हटले आहे.