मुंबई – शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी राज्यात नवीन सरकार आल्यापासून विरोधकांवर खोचक शब्दांत टोलेबाजी करण्याची एकही संधी सोडलेली नाही. अश्यातच आता पुन्हा एकदा शहाजीबापू पाटील यांनी एक मोठं वक्त्यव्य केलं असून, त्यांचं हे वक्त्यव्य सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे.
यावेळी त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. एका कार्यक्रमादरम्यान शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केल्याचं दिसून आलं.
यावेळी बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांना काय झालं होतं? अडीच वर्षे घरात बसून होते. तरणाताठा गडी असल्यासारखं आता फिरतायेत. आता कुठं गेला मणका आणि मणक्याचं दुखणं?, असा सवाल शहाजीबापू पाटील यांनी विचारला आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे घराबाहेर पडले नाहीत, अशी टीका अनेकांकडून वारंवार केली जात आहे. अश्यातच शहाजीबापूंनी आज पुन्हा एकदा याच कारणावरून उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
दरम्यान, यावेळी शहाजीबापूंनी कर्नाटक निवडणुकीच्या निकालावरून खासदार संजय राऊत यांना देखील चांगलाच सुनावलं आहे. कर्नाटकात निवडणुकांमध्ये काँग्रेसला घवघवीत यश मिळालं आहे. तर भाजपचा दारूण पराभव झालाय. यावरून संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. तर काँग्रेसचं कौतुक केलं आहे.
मात्र, यावरून आता शहाजीबापू पाटील यांनी राऊत यांचा जोरदार समाचार घेतला आहे. ‘निकाल कर्नाटकाचा आणि संजय राऊत उड्या मारतंय इकडून तिकडं… पोरगं कुठं झाल आणि बारशं कुठं घालायचं चाललंय…’ असं म्हणत शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.