जळगाव – गेल्या 15 वर्षांपूर्वी राज्यात मोठ्या प्रमाणात स्त्री भ्रूण हत्या झाल्या आहेत. त्याचा परिणाम आताच्या तरूण पिढीला भोगावे लागत आहेत. आज प्रत्येक गावातील स्थिती पाहिली तर निश्चितच लग्नाच्या वयाच्या मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण खुप कमी आहे. काही ठिकाणी गावात 100 मुले लग्नाची असतील तर त्या गावात केवळ 20 मुलीच लग्नाच्या वयाच्या आहेत. त्यामुळे मुलींच्या आणि तीच्या घरच्यांच्या मुलांकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. तर बहुतांश ठिकाणी शेतकरी तरूणाला मुलगी देण्याचे लोक टाळत असल्याचे चित्र दिसून येतआहे.
अशातच जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील नाचणखेड गावातील एका तरूण शेतकऱ्याचा फोटो सोशल मीडियावार व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दिसत आहे की, त्याने त्याच्या डोक्याला मुंडावळ्या बांधल्या आहेत तसेच हातात एक फलक घेतले असून त्यावर ‘बागायतदार आहे बागायतदारीण पाहिजे’ असे लिहिले आहे. या तरूणाने अनोखे आंदोलन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पंकज महाले असे या तरूणाचे नाव आहे.
पंकज म्हणतो की, तो दहा एकर बागायती जमिनीचा मालक व उच्च शिक्षण असतही आहे. मात्र केवळ शेतकरी असल्याने लग्नासाठी मुलगी मिळत नाही. यामुळे हताश झाल्याने त्याने हे आंदोलनाचे पाऊल उचलले. दरम्यान, सध्या लग्नाचा सीजन सुरु असून अशातच राज्यात अनेक तरुण लग्न करण्यास इच्छुक असताना मुलगी मिळणे अवघड होऊन बसले आहे. अनेक मुलींचे वडील शेतकरी नवरा नको म्हणून टाळाटाळ करत असल्याचे देखील समोर आले आहे.
पंकजने बीएस्सी अॅग्रीकल्चरचे उच्च शिक्षण घेतले आहे. त्याची गावात दहा एकर बागायत अर्थात पाण्याची मुबलकता असलेली जमीन आहे. सध्या नोकरी नसल्याने तो बेरोजगार असून, घरच्या शेतीची मशागत करतो. मात्र, बागायती शेती असतानादेखील केवळ नोकरी नाही, म्हणून त्याला लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने त्याचे वधू संशोधन सुरू आहे. विवाहयोग्य मुलगी मिळत नसल्याने पंकज हताश झाला आहे. हीच समस्या अनेक तरुण शेतकऱ्यांचीदेखील आहे. शेतकरी आहे, ग्रामीण भागात राहत असल्याने मुली मिळत नाही.
येत्या 10 वर्षानंतर विवाहयोग्य मुलींची संख्या वाढणार –
गेल्या काही वर्षांत स्त्री भ्रूण हत्येसंदर्भात कठोर कायद्यांची अंमलबजावणी सुरु आहे. त्यामुळे स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण अत्यल्प आहे. तर एका अहवालानुसार सध्या मुलींचा जन्मदर वाढत आहे. त्यामुळे येत्या 10 वर्षांनंतर मुलींची संख्या वाढणार असून सध्या जशी परिस्थिती आहे ती बदणार आहे.