जयपूर – कर्नाटकच्या निकालावर प्रतिक्रिया देताना राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे की, कर्नाटकने जातीय राजकारणापेक्षा विकासाचे राजकारण निवडले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटक विधानसभेचे निकाल दोन्ही पक्षांसाठी मोठ्या प्रमाणावर लिटमस टेस्ट म्हणून गणली गेली त्यात कॉंग्रेसने बाजी मारली.
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणातील आगामी विधानसभा निवडणुकीतही याचीच पुनरावृत्ती होईल, असे गेहलोत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. या वर्षाच्या अखेरीस चारही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.
गेहलोत म्हणाले की, राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’दरम्यान कर्नाटकात जे वातावरण दिसत होते ते निवडणूक निकालांमध्ये स्पष्टपणे दिसून येते. यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस नेत्यांनी कर्नाटकात मोठी प्रचार मोहीम चालवली, त्याचे हे यश आहे असे गेहलोत यांनी म्हटले आहे.