नवी दिल्ली : उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची सुलेमानसेना केली आहे. तर महाराष्ट्रातील शकुनी मामा उद्धव ठाकरेंना घेऊन डुबणार आहेत, अशा शब्दात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा टिकास्त्र सोडले आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यातच नव्हे तर देशभरात गाजलेले राणा दाम्पत्याने नवी दिल्लीतून पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील ठाकरे सरकार, मुंबई महापालिकेचा कारभार यावर कडाडून टीका केली आहे. यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्याची दुर्दशा झाली आहे. असा आरोप आमदार राणा यांनी केला आहे.
नवनीत राणा म्हणाल्या, मुंबईतील घराला मिळालेल्या नोटिशीला आम्ही कायदेशीर मार्गाने उत्तर देणार आहोत. विचारधारा सोडलेल्या लोकांपासून राज्याला वाचवावे यासाठी आम्ही दिल्लीत हनुमानाची आरती करणार आहोत. 14 मेला राज्यात मुख्यमंत्री ठाकरेंची सभा आहे, त्याच दिवशी आम्ही दिल्लीत महाआरती करणार आहोत.
आता जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 14 तारखेला भाषण करतील तेव्हा त्यांनी माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यावे. तो म्हणजे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: निवडणूक लढणार का? लढणार तर कोणत्या मतदार संघातून? याची उत्तरे मुख्यमंत्र्यांनी द्यावीत, असेही त्या म्हणाल्या.
उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांची हत्या केली. आम्ही घाबरणारे नाहीत तर लढा देणारे आहोत असे राणांनी म्हटले आहे. तर आम्ही चांगल्या हेतूने हनुमान चालिसा म्हणणार होतो. माझा रिपोर्ट मागण्याचा अधिकार शिवसेनेला कुणी दिला? उद्धव ठाकरे दोन वर्षे सभागृहात आले नाहीत, त्यासाठी त्यांनी तब्येतीचे कारण दिले. आधी त्यांचा रिपोर्ट द्यावा, मग मीही माझा रिपोर्ट देते, असे आव्हानच नवनीत राणांनी दिले.