मुंबई – एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदार आणि काही खासदारांनी बंड केला. त्यानंतर शिवसेना पक्षावरच दावा केला. याप्रकरणी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर ११ मे रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने केली होती. परंतु यासंबंधीचा निर्णय सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. या सुनावणीला आता दोन महिने होत आले तरी विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाने आता विधानसभा अध्यक्षांविरोधात पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. ‘सुप्रीम कोर्टाने ११ मे रोजी आमदारांच्या अपात्रतेसंबंधीचा निर्णय वाजवी वेळेत घ्यावा, असे निकालात सांगितले होते. परंतु यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी अद्याप कोणतंही पाऊल उचलेलं नाही. आम्ही विधानसभा अध्यक्षांना आतापर्यंत तीन वेळा निवेदन दिले आहे, परंतु त्याचा काही परिणाम झाला नाही’ असे या याचिकेत म्हंटले आहे.
दरम्यान, १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष देतील, असे घटनापीठाने स्पष्ट केले होते. यामुळे शिंदे सरकारला दिलासा मिळाला होता. मात्र अपात्रतेचे प्रकरण निकाली काढण्यासाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नव्हती. यानंतर अद्याप अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदारांबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.