नागपूर – भाजप-शिवसेनेच्या युतीच्या काळात भाजपने कधीच मुख्यमंत्री पदाची मागणी केली नाही. त्यावेळी 1989 साली ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री ठरले होते, मग शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. आता मात्र मतदान होते, निकाल लागतो आणि नंतर वाट्टेल त्या प्रकारे निर्णय घेतले जातात. पंतप्रधान मोदी, अमित शहा हे प्रचारावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असे बोलत होते, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आक्षेप का घेतला नाही?, हा मतदारांचा अपमान आहे. या सगळ्या गोष्टी मतदारांसमोर येणे आवश्यक असल्याचे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
फॉक्सकॉन प्रकरणाची चौकशी व्हावी –
उद्योगांना आकर्षित करण्याच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशातील आघाडीचे राज्य होते, परंतु हे बदलत आहे. जे उद्योग महाराष्ट्रात यायला हवे होते ते आता इतर राज्यात का स्थलांतरित झाले आहेत, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यानंतर राज्यात सत्ताधारी-विरोधकांत आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. यावरून आता राज ठाकरे यांनी भाष्य करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. राज ठाकरे म्हणाले, राज्यात आलेला उद्योग बाहेर जातोच कसा? नेमकं कुठं फिस्कटलं याची चौकशी व्हावी. तसेच या प्रकरणात पैशांची मागणी केली गेली आहे का याचीही चौकशी केली गेली पाहिजे, असे ते म्हणाले.
राजकारण वैयक्तिक नसतं, वैचारिक धोरणांवर मी टीका करतो. माझा काय धोरणांना विरोध होता. पंतप्रधान मोदींवरही वैयक्तिक टीका केली नाही, त्यांच्या धोरणांवर टीका केली. मनसेने मविआ सरकारचे कधीच कौतुक केले नाही. सत्ताधाऱ्यांविरोधात लढूनच पक्ष मोठा होत असतो, असेही ते म्हणाले.