अयोध्या – राममंदिराला ज्यांनी विरोध केला, अशा विचारधारेच्या पक्षांसोबत उद्धव ठाकरेंनी सरकार बनवले. मात्र, आम्ही ही चूक 7-8 महिन्यांपूर्वी दुरुस्त केली, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. अयोध्येत आज पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अयोध्येत राममंदिर बनावे हे बाळासाहेब ठाकरे व लाखो रामभक्तांचे स्वप्न होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. भाजप आणि शिवसेनेचे विचार एकच आहेत. मात्र, काही जण जाणीवपूर्वक दोन्ही पक्षांत मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
शिंदे म्हणाले, काही जण धनुष्यबाणावरून आमच्यावर टीका करत आहेत. शिवधनुष्यबाण हे प्रभू श्रीरामाचे आहे. त्यामुळे धनुष्यबाणावर टीका करून ते प्रभू श्रीरामाच्या धनुष्यबाणाचा अपमान करत आहेत. ज्यांनी राममंदिराला विरोध केला त्यांच्यासोबत उद्धव ठाकरेंनी सरकार बनवले. सत्तेच्या हव्यासापोटी उद्धव ठाकरेंनी चुकीचा निर्णय घेतला. आम्ही ही चूक दुरुस्त केली आहे, असेही शिंदेंनी म्हटले आहे.
अनेकांना हिंदुत्वाची ऍलर्जी
काही जणांना हिंदुत्वाची ऍलर्जी आहे. त्यामुळेच ते आमच्या अयोध्या दौऱ्यावर टीका करत आहेत, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांना दिले. शिंदे पुढे म्हणाले, महाराष्ट्रात रावणराज्य असल्याची टीका काही जण करत आहेत. महाराष्ट्रात साधुसंतांची हत्या झाली ते काय रामराज्य होते का, असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.
अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारणार
अयोध्येत भव्यदिव्य महाराष्ट्र भवन उभारणार, अशी घोषणाही मुख्यमंत्री शिंदेंनी केली. तसेच उत्तर भारतीय आणि महाराष्ट्र वेगळे नाही. अयोध्येतील महाराष्ट्र भवनामुळे रामाच्या दर्शनासाठी येणाऱ्या महाराष्ट्रातील भाविकांची मोठी सोय होईल, असेही शिंदे यांनी म्हटले आहे. शिंदे म्हणाले, अयोध्येतील वातावरण राममय झाले आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात वेगळेच कंपण जाणवले. राममंदिर आमच्यासाठी श्रद्धा, अस्मितेचा विषय आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मंदिराच्या कामाला वेग आला आहे. मंदिराचे काम इतक्या वेगाने होत आहे, ही आश्चर्याची गोष्ट आहे. आज अयोध्येत प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. माझ्या आयुष्यातील हा सर्वात भाग्यशाली दिवस आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच मी इथे आलो. माझे जंगी स्वागत झाले. यापूर्वी मी कार्यकर्ता म्हणून यात्रेचे नियोजन करायचो. मात्र, आता माझ्या कार्यकर्त्यांनी या यात्रेचे नियोजन केले.
घरात बसून काम करणारा नाही
महाराष्ट्रात अवकाळी पावासामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मी ऑफिस किंवा घरात बसून काम करणारा मुख्यमंत्री नाही. मी जमिनीशी नाते असणारा मुख्यमंत्री आहे. प्रभू रामाच्या आशीर्वादाने आम्हाला शिवसेना नाव आणि चिन्ह मिळाले, असेही शिंदेंनी यावेळी म्हटले.