मुंबई – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या मुंबई येथील मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेत राज्यपालांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. राज्यपाल कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात बोलताना, ‘महाराष्ट्रातून, विशेष करून मुंबई, ठाण्यातून गुजराती, राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास येथे पैसेच शिल्लक राहणार नाहीत.’ असे वक्तव्य केले होते. त्यांच्या याच वक्तव्यानंतर ते टीकेचे धनी ठरताना दिसत आहेत. अशातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, ‘कोश्यारींना कोल्हापुरी जोडा दाखवण्याची आता वेळ आलेली आहे.’ असं म्हणत निशाणा साधला.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
“महाराष्ट्राची काही खाद्य संस्कृती आहे, हे सगळे त्यांनी या दोन अडीच वर्षामध्ये पाहिलेले असेलच. म्हणजे सगळ्या चांगल्या गोष्टी पहिल्या असतील. महाराष्ट्राचा धीर देखील त्यांनी पाहिला आहे. पण कोल्हापूरचा जोडा त्यांनी पाहिला नाही. कोल्हापूरी वाहन, जो जोडा आहे तो सुद्धा त्यांना कोणीतरी दाखवण्याची गरज आहे कारण ते सुद्धा महाराष्ट्राचं एक वैभव आहे. त्याचा अर्थ कोणी कसा लावायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
“…त्यांना सुद्धा धडा शिकवण्याची ताकद इथल्या सामान्य माणसात आहे”- शरद पवार
“पण कोल्हापुरी वाहणा कोल्हापुरी जोडे हे जगप्रसिद्ध आहेत. आणि ते सुद्धा आता त्यांना दाखवण्याची वेळ आलेली आहे. कारण महाराष्ट्रामध्ये साधी माणसं कष्टाने वर येतात. हे दाखवण्यासाठी म्हणून मी कोल्हापूरचा जोडा म्हणालेलो आहे. त्या जोड्याचा बाकी उपयोग काय आहे? कोण कसा करेल? कारण त्याच्यात सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. तर असं जर का त्यांचं असेल तर त्यांना कोल्हापुरी जोडा सुद्धा आता दाखवण्याची वेळ आलेली आहे.” असा घणाघात ठाकरे यांनी केला.
दरम्यान, कोश्यारी यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात मोठा वाद पेटला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपण राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचं स्पष्ट केले आहे.
राज ठाकरेंचा राज्यपालांना इशारा,’मराठी माणसाला डिवचू नका, बोलून वातावरण गढूळ करू नका’