नाशिक (मालेगाव) – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र शब्दात संताप व्यक्त केला जात आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील राज्यपालांच्या विधानाबाबत भाष्य केलं आहे. मराठी माणसाच्या अस्मितेशी कोणालाही अवहेलना करता येणार नाही. मुंबईबाबत बाळासाहेंची जी भूमिका होती तीच आमची भूमिका असल्याचे शिंदे यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे हे नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना राज्यपालांच्या वक्तव्याबाबत त्यांनी आपली भूमिका मांडली राज्यपालांच्या वक्तव्याशी सहमत नाही,आम्हाला ते मान्य नाही असं स्पष्ट मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलं.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील मांडली भूमिका
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही. असं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. तसेच राज्यपाल त्यांच्या विधानाबाबत स्पष्टीकरण देतील असं देखील फडणवीस म्हणाले. विशेष म्हणजे फडणवीसांच्या भूमिकेनंतर थोड्याच वेळात मुख्यमंत्री शिंदेनी देखील फडणवीसांप्रमाणे वक्तव्य करत राज्यपालांच्या वक्तव्याबाबत आपलं मत मांडलं.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास येथे पैसेच शिल्लक राहणार नाहीत, असं वक्तव्य केलं. त्यांचं हे वक्तव्य वादग्रस्त ठरत आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.