सातारा (प्रतिनिधी) – मराठा समाजाला आरक्षण देण्याची राज्य सरकारची इच्छा दिसत नाही. मराठा आरक्षणाबाबतच्या बैठकांमध्ये गांभीर्य दिसत नाही. टंगळमंगळ करण्यासाठी बैठका घेतल्या जातात का? असा संतप्त सवाल खा. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे.
मराठा समाजातील लाखो तरुण विपरित परिस्थितीत आहेत. आरक्षणाचा प्रश्न आता सुटला नाही, तर तो कधीच सुटू शकत नाही, याची जाणीव मराठा समाजातील तरुणांना झाली आहे. हा विषय सरकारने गांभीर्याने घेतला नाही, तर मराठा तरुण टोकाचे पाऊल उचलू शकेल, असा इशाराही उदयनराजेंनी दिला आहे.
मराठा आरक्षणाच्या विषयावर उदयनराजे यांचे मुंबईत गाठीभेटींचे सत्र सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गजांसमोर उदयनराजेंनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात वेळोवेळी भूमिका मांडली आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात चित्र स्पष्ट होत नसल्याने उदयनराजेंनी आपला संताप परखड शब्दांत व्यक्त केला आहे. याबाबतच्या प्रसिद्धीपत्रकात त्यांनी म्हटले आहे की, आम्हाला आरक्षण तरी द्या, अन्यथा विष पिऊन मरू द्या, अशी मानसिकता मराठी तरुणांची झाली आहे.
महाराष्ट्रात बहुसंख्येने असलेल्या मराठा समाजाचा फक्त मतांसाठी वापर करणाऱ्यांनी अनेक वर्षे समाजाला झुलवत ठेवले आहे. मराठा समाजातील तरुणांना गृहीत धरून सत्तेवर बसणाऱ्यांनी आरक्षणाचा प्रश्न लोंबकळत ठेवला आहे. इतर समाजांना आरक्षण देताना गांभीर्याने विधाने करणारे आणि कायदेशीर बाजू लावून धरणारे सत्ताधारी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नात मात्र मेखा मारून बसले आहेत. अलीकडे होत असलेल्या बैठकांमध्येही मला फारसे गांभीर्य दिसत नाही.
आरक्षणाच्या प्रश्नासाठी आजपर्यंत 40 पेक्षाही जास्त मराठा बांधवांनी बलिदान दिले आहे. आरक्षणासाठी रस्त्यावरचा संघर्ष देशाने पाहिला आहे. गुरंढोरं, बायकामुलांसह मराठा समाज क्रांती मोर्चात रस्त्यावर उतरला होता. न्यायालयाने कायद्याला स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारने जी पावले उचलायला हवी होती, ती का उचलली नाहीत? या कायद्याला स्थगिती दिल्यानंतर सरकारने केलेली कार्यवाही सदोष होती. कायद्याला मिळालेली स्थगिती उठवायची असेल तर रिव्ह्यू पिटिशन का दाखल केली नाही? त्याउलट राज्य सरकारने सुधारित अर्ज का दाखल केला?
अर्ज सर्वोच्च न्यायालयात सुनावणीस आला, तेव्हा बाजू न मांडता, आम्हाला घटनापीठासमोर सुनावणी करायची असल्याचे राज्य सरकारने न्यायलयाला का सांगितले? त्यानंतर घटनापीठासमोर सुनावणी सुरू झाली, तेव्हा आपली तयारी नसल्याचे सांगून सरकारने तयारीसाठी वेळ का मागून घेतला? हा घटनाक्रम पाहिला तर राज्य सरकारमध्ये बसलेले मराठा आरक्षणासंदर्भात किती उदासीन आहेत, हे लक्षात येते, अशी खरमरीत टीका उदयनराजेंनी केली आहे.