नगर (प्रतिनिधी) – यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे पाटील यांच्या खून प्रकरणात सरकार पक्षातर्फे बाजू मांडण्यासाठी ख्यातनाम वकील उमेशचंद्र यादव-पाटील यांनी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागातर्फे काल हे आदेश देण्यात आले.
फिर्यादीच्यावतीने बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्वल निकम किंवा उमेशचंद्र यादव पाटील यांचीच नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी जरे यांच्या कुटुंबातर्फे राज्य सरकारकडे करण्यात आली होती. त्याची दखल घेऊनच यादव पाटील यांनी नियुक्ती करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. विधी व न्याय विभागाच्या विभाग अधिकारी वैशाली पी. बोरुडे यांच्या सहीने ही नियुक्ती झाली आहे.
तीन महिन्यांपूर्वी 30 नोव्हेंेबर 2020 रोजी नगर पुणे रस्त्यावरील जातेगाव घाटात रात्री पावणे आठच्या सुमारास रेखा जरे यांची गळा चिरुन हत्या करण्यात आली आहे. मोटारसायकला जरे यांच्या वाहनाचा कट लागल्याचा बनाव त्यावेळी करण्यात आला. मात्र, जरे यांच्या मुलाने मोबाईलमध्ये हल्लेखोराचा फोटो काढल्याने जरे यांची खून सुपारी देऊनच झाल्याने पोलीस तपासात अवघ्या काही तासांत उघडकीस आले.
दरम्यान, पोलिसांनी त्याचा छडा लावत अवघ्या चोवीस तासांत तब्बल पाच संशयित आरोपी अटक केले. त्याच संशयितांकडून मिळालेल्या माहितीनुसार हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे असल्याचे समोर आले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी 2 डिसेंबर 2020 रोजी पत्रकार परिषदेत दिली. तेंव्हापासून बोठे पसार झाला आहे. त्याचा अजुनही पोलिसांना ठावठिकाणा लागलेला नाही.
हत्याकांडातील मुख्य संशयित आरोपी बाळ बोठे तीन महिन्यांपासून सापडत नसल्याने, अखेर त्यास फरार घोषित करण्यात आलेले आहे. त्यासाठी पोलिसांनी पारनेर येथील न्यायालयात अर्ज केला होता. तत्पूर्वी बोठेला पकडण्यासाठी न्यायालयाने पोलिसांच्या अर्जावरुन स्टँडींग वॉरंट देखील मंजूर करुन घेतलेले आहे. फरार घोषित करण्यापूर्वी बोठे यास पोलिसांत हजर होण्यासाठी येत्या 9 एप्रिलचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे. 9 एप्रिलपूर्वी तो हजर न झाल्यास मालमत्ता जप्तीसारखी पुढील कारवाई करण्यात येईल, असा इशाराही न्यायालयाने दिलेला आहे.