नागपूर : मोहित काळे, फैज फजल आणि अक्षय वाडकर यांच्या फलंदाजीनंतर गोलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर विदर्भानं रणजी चषक स्पर्धेच्या दुस-या सामन्यात राजस्थानचा एक डाव अन् ६० धावांनी पराभव केला आहे. या विजयासह रणजी चषक स्पर्धेत विदर्भाचे एकूण १० गुण झाले आहेत. पहिल्या सामन्यात आंध्र आणि विदर्भ यांच्यातील लढत अनिर्णित राहिल्यानं विदर्भाला ३ गुण मिळाले होते.
Vidarbha Won by an innings and 60 Run(s) #VIDvRAJ @paytm #RanjiTrophy Scorecard:https://t.co/fMg7QBYVzy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 20, 2019
विदर्भाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मोहित काळेच्या १३८, फैज फजलच्या १३६, अक्षय वाडकरच्या १११, वसीम जाफरच्या ६० आणि गणेश सतीशच्या ४३ धावांच्या जोरावर पहिल्या डाव ८ बाद ५१० वर घोषित करत धावांचा डोंगर उभा केला. राजस्थानकडून टी हक्कने सर्वाधिक ४ गडी बाद केले.
त्यानंतर विदर्भाने उमेश यादवच्या ५ आणि आदित्य सरवटेच्या ३ बळीच्या जोरावर राजस्थानचा पहिला डाव २६० वर संपुष्टात आणला. राजस्थानकडून पहिल्या डावात महिपाल लोमरोरने सर्वाधिक ९७, राॅबिन बिश्तने ३७, गौतमने ३६ आणि रवी बिश्णोईने ३९ धावा केल्या.
फाॅलोआॅनची नामुष्की ओढवल्यानंतर दुस-या डावातही राजस्थानचा डाव गडगडला. दुस-या डावात गोलंदाजीत आदित्य सरवटेच्या ४, अक्षय वखेरेच्या ३ आणि अक्षय कर्णेवारच्या २ बळीच्या जोरावर विदर्भांन राजस्थानचा दुसरा डाव १९० धावांत गुंडाळत १ डाव अन् ६० धावांनी विजय मिळवला.
राजस्थानकडून दुस-या डावात रवी बिश्णोईने ५८, अशोक मेनारियाने ४९ आणि राॅबिन बिश्तने ३१ धावा केल्या. याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर तग धरता आला नाही आणि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागलं.