औरंगाबाद – पैठण-पाचोड रस्त्यावर दोन दुचाकींच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. वेगाने धावणाऱ्या दुचाकी एकमेकांवर आदळल्याने हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, यातील एक तरूण आपल्या पत्नीला बारावीच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर सोडून परत निघाला होता. तर दुसरा एक जण नातेवाईकांच्या घरी कुंकवाच्या कार्यक्रमावरून गावी परतत होता. अपघातात आणखी एक जण गंभीर झाला आहे.
औरंगाबादच्या पैठण पाचोड रस्त्यावर डाव्या कालव्याजवळ झालेल्या भीषण अपघातात दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. भरधाव गाड्या एकमेकांवर आदळताच गाडीवरील नितीन साबळे हे रस्त्याच्या कडेला असलेल्या एका शेतात सुमारे अडीचशे ते तीनशे फूट लांब जाऊन पडले तर, आणखी एकाचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघाताची नोंद पैठण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन त्यांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेत त्यांना त्वरित शासकीय रुग्णालयात हलवले. तर जखमीला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात हलवण्यात आले.