कोरेगाव – तांदुळवाडी (ता. कोरेगाव) येथे आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये बैलगाडी कृष्णा नदीत घुसून दोन बैलांचा अंत झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. दरम्यान, रात्री उशिरापर्यत या घटनेची कोठेही नोंद झालेली नाही. यात बैलमालकांचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, तांदुळवाडी येथे कोल्हेश्वर देवस्थानच्या शेजारील मैदानावर बैलगाड्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडी शर्यतीच्या ठिकाणापासून दोनशे फूटावरून कृष्णा नदी वाहते. सकाळी 11 वाजता बैलगाडा शर्यतीला सुरुवात झाली. या शर्यतीमध्ये जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरील जवळजवळ शंभर बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. दुपारी एक वाजेपर्यंत सात फेऱ्या पूर्ण झाल्या. आठव्या फेरीच्या वेळी एक बैलगाडी चाकोरीमधून उधळली. ती मैदानाशेजारून वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या पात्रात गेली.बैलगाडीचा पळण्याचा वेग जास्त होता. त्यामुळे बैलगाडी चालकाला गाडी आवरता आली नाही.
त्याने नदीच्या पात्राच्या अलीकडे गाडीतून उडी घेतली. त्यामुळे त्याचा जीव वाचला. कृष्णा नदीवर कठापूरजवळ मोठा बंधारा बांधला आहे. त्याचे बॅक वॉटर तांदुळवाडीपर्यंत साठलेले आहे. नदीमध्ये वाळू आणि रेती मोठ्या प्रमाणात आहे. पाणीसाठा भरपूर झाला आहे. त्यामुळे नदीत गेलेली बैलगाडी वाळूमध्ये रुतून बसली. गावातील तरुणांनी नदीत उड्या घेऊन गाडी आणि बैलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. बैलांना व गाडीला बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत बैलांचा मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर बैलगाडा शर्यत थांबवण्यात आली. शर्यतीसाठी रीतसर परवानगी घेण्यात आली होती. पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बॅरिकेटस उभारण्यात आले होते. हे बॅरिकेट्स तोडून बैलगाडी नदीकडे गेली आणि त्यामुळे ही घटना घडली असल्याचे प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितले. या घटनेमध्ये मृत्यू पावलेल्या बैलजोडीतील एक बैल त्रिपुटी तर दुसरा बैल मालगाव येथील असल्याचे समजते. बैलांची किंमत जवळपास दहा लाखाच्या आसपास आहे. त्यामुळे बैल मालकांचे मोठे नुकसान झाले आहे.