पुणे – राज्य शिक्षण मंडळामार्फत बारावीचा निकाल जाहीर करताना अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी असणारी फेरपरीक्षेच्या तारखाही जाहीर करतात. यंदा मात्र करोनामुळे मेऐवजी जुलै महिन्यात निकाल जाहीर झाला. आता दरवर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यात होणारी फेरपरीक्षा कधी होणार याबाबत अद्याप काहीच उत्तर बोर्डाकडे नाही. त्यामुळे यंदा फेरपरीक्षा होण्याची शक्यता कमी असल्याची चिन्हे आहेत.
दहावी-बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी राज्य सरकारने जुलै-ऑगस्ट महिन्यात फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाची संधी मिळते. मात्र, यंदा करोनामुळे विद्यापीठ परीक्षा रद्द झाल्या. तर, राज्य मंडळाचा बारावीचा निकाल दीड महिने उशिरा जाहीर झाला. तर, दहावीचा निकाल जुलैअखेर जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात फेरपरीक्षा घेणे शक्य नाही.
यंदा मंडळाने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकातदेखील या परीक्षांचा उल्लेख नाही. त्यामुळे या परीक्षा पुन्हा ऑक्टोबर होण्याची शक्यता असून, शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाल्याने त्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांना उच्चशिक्षणाची संधी मिळणार नाही. त्यामुळे यंदा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात, तूर्तास फेरपरीक्षेचा कोणताच निर्णय विचारात नसल्याचे बोर्डाने स्पष्ट केले.
दहावीचा निकाल महिनाअखेर
बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आठ ते दहा दिवसांत दहावीचा जाहीर केला जातो. यंदा करोनामुळे उत्तरपत्रिका तपासणीचे काम विलंबाने होत आहे. त्यामुळे दहावीचा निकाल जुलैअखेरपर्यंत लागण्याची शक्यता आहे, असे राज्य शिक्षण मंडळाने म्हटले आहे.