उपनगर प्रतिनिधींकडून
पुणे – निर्बंध शिथिल केल्यानंतर नव्या नियमानुसार उपनगरांतील दुकाने उघडण्यात येत आहेत. दुपारी चार वाजेपर्यंत वेळ वाढवून दिली असली तरी गाहकांची गर्दी ठराविक दुकानांतच होत आहे. हार्डवेअर, कपडे आणि किराणा दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी होत आहे.
उपनगरांतील बाजारपेठांत उलाढाल हळूहळू वाढू लागली आहे. सध्या, ग्राहक कमी असले तरी दोन दिवसांत खरेदीसाठी गर्दी वाढेल, अशी आशा व्यापाऱ्यांना आहे. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करीत दुकाने उघडण्यात परवानगी देण्यात आल्यानंतर कात्रज, आंबेगाव बुद्रुक, विश्रांतवाडी, धानोरी, येरवडा, हडपसर परिसरात सकाळपासून वर्दळ वाढली आहे.
दुकाने उघडण्यात येत असली तरी सकाळी 7 ते 10 यावेळी काहिशी गर्दी होते तर दुपारी ग्राहक कमी येत असून दुपारी 4 वाजता दुकान बंद करताना काहीशी विक्री होत असल्याचे दुकानदार सांगत आहेत. महिन्याची चालू तारीख असल्याने आता एक-दोन दिवसात खरेदीसाठी ग्राहक गर्दी करतील, असे दुकानदार सांगत आहेत.
बाजारपेठेत किराणा, कपडे तसेच हार्डवेअर मध्ये गर्दी अधिक आहे. तर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानात ग्राहक काही प्रमाणात दिसून येत आहेत. सराफबाजार मात्र अद्यापही थंड आहे. धनकवडी, बालाजीनगर, कात्रज परिसरातील अनेक दुकानदारांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या स्किम सुरू केल्या आहेत. कोथरूड, औध परिसरातील बाजारपेठांही संपूर्ण “ओपन’ झाल्या आहेत. मिठाई, खाद्य पदार्थाच्या दुकानांत गर्दी दिसून आली. बाहेर गर्दी आलीं.
हडपसर आणि सिंहगड रोड परिसरात सुद्धा दुकाने सुरू झाली होती. पण, ग्राहक फारसे दिसत नव्हते. ग्राहक कमी असले तरी आता दुकाने सुरू झाल्याने हळूहळू गर्दी वाढेल अशी आशा दुकानदारांनी व्यक्त केली आहे. व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
हॉटेलमधून पार्सललाच पसंती….
उपनगरात अनेक छोटी-मोठी हॉटेल सुरू झाली आहेत. पार्सलची सुविधा असताना काही ठिकाणी सोशल डिस्टन्स नुसार ग्राहकांना बसू दिले जात आहे. परंतु, ग्राहकांकडून अद्यापही पार्सल घेऊन जाणे किंवा मागवणे यासच पसंती दिली जात आहे. बहुतांशी ठिकाणी रस्त्यावरील खाद्य पदार्थांचे स्टॉल मात्र अद्यापही बंद आहेत.