अमरावती – राज्यात काही महिन्यापूर्वी झालेल्या सत्तांतरापासून ते आजपर्यंत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शाब्दिक चकमक उडताना पाहायला मिळत आहे. त्यातच शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद न मिळलेल्या नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चादेखील रंगू लागल्या आहेत. त्यामुळे यात कोण-कोणत्या नेत्यांचा समावेश करण्यात येतो वरून राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत.
आपल्या मंत्रीपदावर लाथ मारून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. पण आता सहा महिन्यांहून अधिक काळ उलटला तरी त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. त्यामुळे हे आमदार अस्वस्थ झाले आहेत.
प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू हे त्यापैकीच एक आहेत. बच्चू कडू यांना अजूनही मंत्रीपद मिळालं नाही. मंत्रिपद मिळालं नसलं तरी आता बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्रीपदावरच दावा केला आहे.
अमरावती येथे एका सभेत बोलतांना ते म्हणाले,’तुम अगर मुख्यमंत्री बनना चाहते हौ, तो हम मुख्यमंत्री बनना चाहते है, असं म्हणत बच्चू कडू यांनी आपल्या मनातील सुप्त इच्छा बोलून दाखवली आहे. प्रहार आपला स्वतःचा पक्ष आहे आपल्या मातीतला आपण निर्माण केलेला पक्ष आहे. हा अमरावतीचा पक्ष आहे. दिल्ली, मुंबईचा पक्ष नाही. लोक आम्हाला म्हणते गद्दारी का केली? असं विचारतात. पण आम्ही काही गद्दारी केली नाही. आमचा पक्ष आहे. तुम्हाला मुख्यमंत्री बनायचंय तर आम्हालाही मुख्यमंत्री बनायचं आहे, असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केल.