-वंदना बर्वे
तृणमूल कॉंग्रेस, डावे पक्ष आणि कॉंग्रेसमध्ये छुपा समझोता झाला असल्याची चर्चा सध्या जोरात आहे. सध्या पाच राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होत असली तरी सर्वांच्या नजरा पश्चिम बंगालवर खिळून आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनीही प. बंगालमध्ये सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे.
प. बंगालमध्ये एकमेकांना मात देण्याचा खेळ सुरू आहे. तृणमूल कॉंग्रेसच्या बऱ्याच नेत्यांनी भाजपची वाट धरली आहे. दीदींना सत्ताच्युत करण्यासाठी भाजपने पूर्ण ताकद पणाला लावली आहे. तर दुसरीकडे, भाजपला रोखण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्ष ममता बॅनर्जी यांच्या मदतीला आला असल्याची चर्चा आहे.
भारतीय जनता पक्षाला प. बंगालच्या सत्तेत येण्यापासून रोखण्याकरिता राज्यातील कट्टर विरोधी पक्ष एकत्रित आल्याची चर्चा आहे. ममता बॅनर्जी यांनी 35 वर्षांची सत्ता उलथवून डाव्यांना खुर्चीवरून खाली खेचले होते. आता हेच डावे पक्ष त्यांच्या मदतीला धावून आले असल्याची चर्चा आहे.
तृणमूल कॉंग्रेस, डावे पक्ष आणि कॉंग्रेसमध्ये छुपा समझोता झाला असल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. तसं बघितलं तर, अशाप्रकारची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही; परंतु डाव्या पक्षांच्या उमेदवारांची यादी बघितली तर समझोत्याच्या चर्चेवर विश्वास बसतो. ममता बॅनर्जी नंदीग्राममधून निवडणूक लढवत आहेत. भाजपने येथून शुभेंदू अधिकारी यांना उमेदवारी दिली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेसुद्धा नंदीग्राममधून मीनाक्षी मुखर्जी यांना मैदानात उतरविले आहे. त्या प. बंगाल युथ फेडरेशनच्या प्रमुख आहेत.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जाणूनबुजून नंदीग्राममधून गैरअल्पसंख्याक उमेदवार उतरविला असल्याची चर्चा आहे. नंदीग्राममध्ये 30 टक्के अल्पसंख्याक मतदार आहेत. या मतांचे विभाजन होऊ नये आणि ते सर्व दीदीच्या खात्यात जावे ही त्यामागची भूमिका आहे. याहीपेक्षा मजेची बाब अशी की, फुरफरा शरीफचे मौलवी अब्बास सिद्दीकी यांचा इंडियन सेक्युलर फ्रंट हा पक्ष नंदीग्राममधून निवडणूक लढण्यास उतावीळ होता. मात्र, माकपाने ही जागा मागितली. माकपा आणि इंडियन सेक्युलर फ्रंट यांची आघाडी झाली आहे, हे येथे उल्लेखनीय.
असं असलं तरी, माकपाने या मतदारसंघात आपली पूर्ण ताकद झोकून दिली आहे. अर्थात, सवर्णांच्या मतांवर माकपाचा डोळा आहे. म्हणजेच भाजपच्या मतदारांचे विभाजन करण्याची योजना आहे. सवर्ण मतांमध्ये विभाजन होईल आणि अल्पसंख्याक मते तृणमूल कॉंग्रेसला पडतील आणि दीदींचा विजय सुनिश्चित होईल. माकपाने ममता बॅनर्जी यांना विजयी बनविण्यासाठी हा डाव खेळला असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
माकपाने नंदीग्रामच्या जागेच्या बदल्यात मौलवी सिद्दीकी यांच्या आयएसएफ या पक्षाला दक्षिण परगणातील भानगढ ही जागा दिली आहे. हा मतदारसंघ म्हणजे माकपाचा बालेकिल्ला. येथे अल्पसंख्याक समुदायाची संख्या खूप जास्त आहे. अशात, ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने या मतदारसंघातून हिंदू उमेदवाराला उतरविले आहे. यामुळे ममता बॅनर्जी यांना सत्ताच्युत करण्याची स्वप्न पाहणाऱ्या भाजपच्या पायाखालची जमीन सरकली आहे. डावे, तृणमूल कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांच्यात छुपा समझोता झाला असल्याचा प्रचार सध्या भाजप करीत आहे.
प. बंगालमध्ये भाजपला मुख्यमंत्रिपदासाठी एकही चेहरा मिळालेला नाही. अशात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नावावर निवडणूक लढविली जात आहे. तरीसुद्धा, मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून भाजपात संघर्ष सुरू झाला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आणि तृणमूल कॉंग्रेसमधून भाजपात आलेले मुकुल रॉय यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
मुख्यमंत्रिपदाच्या या शर्यतीत रॉय यांची स्थिती मजबूत दिसून येत आहे. कारण, भाजपने रॉय यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. तर, दिलीप घोष यांना भाजपने तिकीट दिलेले नाही. रॉय यांना उत्तर कृष्णानगरमधून लढविले जात आहे. खडगपूर हा त्यांचा मतदारसंघ आहे. येथून भाजपने दुसरा उमेदवार उतरविला आहे.
2019 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत खडगपूर मतदारसंघातून भाजपला पराभवाचे तोंड बघावे लागले होते. म्हणून रॉय यांना येथून न उतरविता कृष्णानगरमधून तिकीट देण्यात आले, असा तर्क दिला जात आहे. प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी लोकसभेच्या निवडणुकीत प्रचंड मेहनत घेतली होती. मात्र, या पराभवाने त्यांच्या कष्टावर विरजन सोडले. घोष अनेक दिवसांपासून रॉय यांची उपेक्षा करीत होते. सध्या घोष यांची प्रकृती बरी नाही. तरीसुद्धा ते मैदानात अंगदसारखे पाय रोवून उभे आहेत.