रांची/ नवी दिल्ली – लवकरच लोकसभेची निवडणूक होणार आहे. झारखंड विधानसभेची निवडणूकही त्याच सुमारास आहे. या राज्यात आदिवासींची संख्या मोठी आहे. मात्र आता आदिवासीच परस्परांच्या विरोधा उभे ठाकले असल्याचे येथे दिसून येते आहे. त्याचे कारण सात वेळा खुंटी येथून संसदेवर निवडून गेलेले भारतीय जनता पार्टीचे नेते खासदार कारिया मुंडा यांनी जाहीर व्यासपीठावरून केलेली डी- लिस्टिंगची मागणी.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनजातीय सुरक्षा मंचाच्या रॅलीत बोलताना मुंडा म्हणाले की, ज्या आदिवासींचे धर्मांतर झाले आहे व ज्यांनी ख्रिश्चन धर्म स्विकारला आहे त्यांच्याकडून अनुसूचित जमाती अर्थात एसटीचा अधिकार परत घेतला गेला पाहिजे. कारण धर्मांतर झालेले हे आदिवासी आदिवासी म्हणून आणि धार्मिक अल्पसंख्याक म्हणूनही असा दुहेरी लाभ मिळवतात. त्यामुळे राज्यात धर्मांतर झालेले आदिवासी आणि आदिवासी यांच्यात आता वादाची ठिणगी पडली आहे.
जनजातीय सुरक्षा मंचचे संयोजक गणेश राम भगत यांच्या म्हणण्यानुसार आदिवासी हे वास्तविक हिंदूच आहेत. जे परंपरावादी आदिवासी आहेत ते हिंदू आहेत. ते धरतीची पुजा करतात, निसर्गाची पुजा करतात आणि मंदिरातही जातात. जोपर्यंत केंद्र सरकार आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही धर्मांतरित आदिवासिंना मिळणाऱ्या दुहेरी सुविधांना आम्ही विरोध करू. मुंडा म्हणाले की आमचे केवळ एवढेच म्हणणे आहे की धर्मांतरित आदिवासींना भारत सरकार आणि विदेशातूनही मदत मिळते.
दरम्यान, धर्मांतरित आदिवासींना सूचीतून हटवण्याची मागणी पूर्णत: घटनाबाह्य आहे असे झारखंड जनाधिकार महासभेचे म्हणणे आहे. समुदायासाठी आरक्षित असलेल्या सरकारी आणि शिक्षण क्षेत्रातील अनेक जागा रिक्त आहेत. कोणत्याही आदिवासी समुहाला अनुसूचित जनजाती मानले जाईल असे घटनेत स्पष्ट म्हटले आहे. त्यात कुठेही धर्माचा उल्लेख केलेला नाही. धर्म आणि आरक्षणाशी संबंधित निराधार तथ्यांच्या आधारावर आदिवासी समुदायात सांप्रदायिक विभाजन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे महासभेने म्हटले आहे.
दरम्यान, आदिवासी विरूध्द आदिवासी या संघर्षाबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की, धर्मांतर झालेल्या आदिवासींच्या विरोधात राजकीय दबाव निर्माण केल्याने मोठा कलह निर्माण होण्याची शक्यता आहे. एकाच गावात आदिवासींच्या अनेक टोळ्या असतात. धर्मांतरित आदिवासी आणि सरना धर्माचे पालन करणारे आदिवासी यांच्यात अगोदरच विभाजन आहे. आता निवडणुका येता येता हे विभाजन तणाव आणि संघर्षाकडे ढकलले जाईल.