राजगुरूनगर -खेड तालुक्यातील आदिवासी भागातील नागरिकांना रोजगाराचे साधन असलेला रानमेवा काही दिवसातच बाजारात विक्रीला येणार आहे. सलग दोन वर्षे करोनामुळे आदिवासी नागरिकांचा रानमेव्यावरील रोजगार बुडाला होता. आता कुठेतरी सावरत असताना त्यांच्या या रानमेव्याचा चांगला भाव मिळणार का याची चिंता उत्पादकांना आहे. करवंद (काळी मैना), जांभूळ, काळी आवळे, तोरणे, रायवळ आंबे यासह उन्ह्याळ्यात सर्वाधिक उत्पन्न देणारा बाळ हिरडा व सीकेखाई काही दिवसांतच विक्रीला येणार असून त्याला चांगला बाजार भाव मिळण्याची अपेक्षा आदिवासी भागातील नागरिकांनी केली आहे.
खेड तालुक्याच्या भीमाशंकर भोरगिरी या सह्याद्रीच्या परिसरात राहणारे नागरिक हे बाळ हिरडा, करवंदे, जांभळे, काळी आवळे, रायवळ आंबे, शिकेखाई आणि मध आदी जंगल संपत्तीवर अवलंबून असतो. याभागात हिरडा हे प्रमुख उत्पादन असते. यावर्षी हिरड्याच्या झाडाला पालवी फुटून मोहोर आला आहे. 15 ते 20 दिवसात बाळ हिरडा तोडणी सुरुवात होईल. याबरोबरच हिरडा झाडाला मोहोर(फुले) आसल्याने त्यात मधमाश्यांची मध गोळा करण्याचे प्रमाण मोठे असल्याने मधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या परिसरात गोळा होणाऱ्या मधला शहरातून मोठी मागणी आहे.
डोंगराची काळी मैना बहरली आहे. करवंदाच्या जाळी फुलल्या आहेत. काही जाळींवर करवंदाचे घड लगडले आहेत. डोंगर भागातील आंबा, फणस, करवंद जांभूळ यासह रानमेवा एप्रिलच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. दोन वर्षांपासून शहरातील नागरिकांना रानमेवा पुरेशा प्रमाणात खायला मिळाला नव्हता यंदा रानमेवा उपलब्ध होणार आहे; मात्र निसर्गाची काय कृपा राहते यावर सर्व अवलंबून आहे.
शासनाचे उदासीन धोरण
शासनाच्या आदिवासी विभागाच्या माध्यमातून करवंद, जांभूळ फणस, आंबा यावर प्रक्रिया करून ज्यूस सारखे पेयजल तयार करण्यासाठी छोटेमोठे कारखाने व बाजारपेठ शासनाच्या उदासीन धोरणामुळे याभागात तयार झाली नाही. विविध उद्योगांना चालना देण्यासाठी सरकार मोठ्या योजना कागदावर आणते मात्र पुढे पाठपुरावा केला जात नसल्याने आदिवासी आदिवासीच राहत आहेत त्याच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करण्याचे सरकार, लोकप्रतिनिधी यांच्याकडून प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे बहुगुणी रानमेवा प्रसिद्धी आणि ग्राहक बाजार पेठेपासून दूर राहिला आहे.