मंचर -निसर्गाच्या कोपाने डोंगराचा कडा कोसळून गाडल्या गेलेल्या माळीणच्या घटनेला गुरुवार (दि. 30) सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. या दुर्घटनेत 44 कुटुंबातील 151 लोक दगावले होते. या घटनेच्या स्मृती लोकांमध्ये अजूनही ताज्या आहेत. यावर्षी करोनामुळे जुन्या माळीण गावात होणारा स्मृतिदिन कार्यक्रम रद्द करण्यात आला असून, कोणीही माळीणकडे येऊ नये असे आवाहन माळीण ग्रामस्थांनी केले आहे.
माळीण (ता. आंबेगाव) येथे 30 जुलै 2014 रोजी रात्रभर पडलेल्या पावसामुळे साचलेले पाणी डोंगराला पडलेल्या भेगांमध्ये साठून डोंगराचा कडा कोसळला होता. अचानक घडलेल्या या घटनेने कोणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही. काही सेकंदातच संपूर्ण गाव ढिगाऱ्याखाली गाडले गेले आणि 40 कुटुंबातील 151 लोकांचा ढिगाऱ्याखाली सापडून मृत्यू झाला. यातील 9 लोक जखमी अवस्थेत सापडले, तर 38 लोक बाहेरगावी कामानिमित्त गेल्याने वाचले.
शासकीय यंत्रणेने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या माध्यमातून आठ दिवस ढगाऱ्याचे खोदकाम करून 151 मृतदेह बाहेर काढले. सरकारकडून मयतांच्या वारसांना प्रत्येक व्यक्तीमागे 8 लाख 50 हजार रुपये देण्यात आले, तसेच विविध योजनांमधून मदत करण्यात आली. दुर्घटना घडल्यानंतर अडीच वर्षांत कायमस्वरूपी पुनर्वसन करून देण्यात आले. या नवीन गावात 68 घरे बांधण्यात आली असून, सर्व 12 मूलभूत सेवासुविधा देण्यात आल्या आहेत.
कमी वेळेत अतिशय सुंदर असे माळीणचे पुनर्वसन झाले आहे. मात्र, खूप प्रयत्न करूनही पाण्याचा स्रोत मिळाला नाही. माळीणला कायमस्वरूपी पाणी मिळावे, यासाठी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पायरडोह येथे मोठा तलाव होण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न केले. या तलावातून माळीणला पाणी देण्याचे नियोजन असून यासाठी बुब्रा नदीवर बंधारे बांधण्यात आले आहेत. 2021 च्या उन्हाळ्यातील दिवसांत माळीणकरांना पाण्यासाठी फिरावे लागणार नाही. यासाठी कायमस्वरुपी पिण्याच्या पाण्याची योजना राबवली जाणार आहे.
– संजय गवारी, सभापती, पंचायत समिती