नवी दिल्ली: पाकिस्तानच्या लष्करी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलेल्या दहशतवाद्यांचा गट जम्मू काश्मीरमध्ये घातपाती कारवाया घडवण्याच्या प्रयत्नात असल्याची गोपनीय माहिती गुप्तचर संस्थांना मिळाली आहे.
अफगाणिस्तानातल्या जलालाबाद येथील पाकिस्तान सैन्याच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपच्यावतीने तालिबानी दहशतवाद्यांना हे प्रशिक्षण दिले गेलेले आहे. जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याच्या घटनेला 5 ऑगस्ट रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच याच दिवशी आयोध्येत राममंदिराचा भूमिपूजन समारंभही होत आहे. त्यामुळे याच दिवशी भारतातील काही ठिकाणी घातपात घडवण्यासाठी हे दहशतवादी प्रयत्नशील आहेत.
तसेच स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी देखील दहशतवादी हल्ला घडवण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न असेल. गेल्या काही आठवड्यांपासून मिळालेल्या गुप्त माहितीच्या एकत्रीकरणातून हा ठाम निष्कर्श काढता येतो आहे. गुप्तचरांकडून दिल्या गेलेल्या या सविस्तर गोपनीय अहवालाच्या आधारे आयोध्या, दिल्ली आणि जम्मू काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
ईद उल फित्रनंतर म्हणजे 26 मे ते 29 मे दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये हल्ला करण्यासाठी तलिबानच्या सुमारे 20 दहशतवाद्यांना पाकिस्तान सैन्याच्या एसएसजीकडून जलालाबादेमध्ये प्रशिक्षण दिले गेले. मात्र सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे दहशतवाद्यांना जम्मू काश्मीरमध्ये कोणताही हल्ला करता येऊ शकला नव्हता.
जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरून या 20-25 दहशतवाद्यांना आणि अशा 5-6 दहशतवाद्यांना भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीसाठी पाकिस्तान सैन्याकडून सहाय्यही केले जाणार असल्याचे गुप्तचरांनी म्हटले आहे.
5 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट या दोन्ही दिवशी दहशतवाद्यांकडून हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेता सुरक्षा दले, पोलीस आणि गुप्तचरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.