वेल्हे – राजगड (ता. वेल्हे) येथे फिरायला आलेल्या 20 वर्षीय तरूणाचा राजगडच्या सुवेळा माची जवळच्या खोल दरीत पडून मृत्यू झाला आहे. सुजय भगवान मांडवकर (वय 20) हा मित्रांसोबत रविवारी (दि. 29) पहाटे 1 वाजता ट्रेकिंगसाठी राजगड किल्ल्यावर आला होता. त्याच्या बरोबर प्रतिक चव्हाण, सुजित पड्याळ, विवेक पड्याळ, अजय पड्याळ, नीलेश चव्हाण, सुजय चव्हाण तसेच इतर 6 जण बरोबर होते.
हे सर्वजण सोमवारी (दि. 30) सकाळी 6 वाजता राजगड किल्ल्याच्या पायथ्याजवळ पोहचले. संपूर्ण किल्ला फिरून झाल्यावर दुपारी तीनच्या दरम्यान सुवेळा माची जवळ गेले असता अचानक आग्या मोहळाच्या मधमाशांनी या सर्वजणांवर हल्ला केला. मधमाशांच्या हल्ल्याला घाबरून ते सर्वजण सैरावैरा पळू लागले. त्यावेळी त्यांच्यातील सुजय भगवान मांडवकर (वय 20 रा.बोरघर, जाधववाडी, ता.खेड जि. रत्नागिरी) हा पाय घसरून 900 फुट खोल दरीत पडून मृत्यूमुखी पडला.
राजगडावर असणाऱ्या सुवेळा माचीवर काळेश्वरी बुरूज व हात्ती बुरूज यांच्या मध्ये तीन खांबी टाक ही खुप मोठी दरी आहे. या दरीच्या अगदी कडेला आल्यामुळे थेट खडकांवर पडून त्याचा मृत्यू झाला आहे. या तरुणाचा मृतदेह काळेश्वरी नाळेतून पाऊल वाटेने वेल्हे पोलीस हवालदार अभय बर्गे, होमगार्ड शिंदे, पोलीस मित्र लक्ष्मण ढेबे, योगेश दरडीगे, शंकर शिर्के, बाळू जाधव, सुभाष दळवी, संतोष शिंदे, अक्षय दरडीगे यांनी लाकडी दांडक्याला झोळी बांधून वर काढली. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विनायक देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेल्हे पोलीस नाईक औदुंबर अडवाल करत आहेत.