पुणे :- आपल्यात उत्साह ध्यास आणि जगात बदल घडविण्याची दुर्देम्य इच्छाशक्ती असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नसते. एमआयटी आर्ट डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठातील, रोविंग या क्रीडा प्रकाराचे राष्ट्रीय प्रशिक्षक संदीप भापकर यांनी अशीच कामगिरी करून ते सिद्ध केले आहे.
संदीप यांनी विद्यार्थी साईकोंडाला सोबत घेत, आशिया खंडातील सर्वांत लांब मार्ग असणाऱ्या काश्मीर ते कन्याकुमारीचा प्रवास सायकलने पूर्ण करताना नशामुक्तिचा संदेश दिला आहे. यासह, त्यांनी हा 3700 किलोमीटरचे आव्हानात्मक अंतर अवघ्या 14 दिवसांत पूर्ण करण्याची किमया साधली आहे.
काश्मिरमधील प्रसिद्ध लाल चौकातून 19 तारखेला सुरु झालेल्या प्रवासात, 10 राज्य, 1 केंद्र शाशित प्रदेश पार करत व सायकल पंक्चर होणे, काश्मिरमधील सैन्याचे विविध चेकपोस्ट, उन्हामुळे होणारे सनबर्न अशी आव्हाने लिलया पार करत संदीप व साईकोंडा यांनी तिरंग्यासह ‘एमआयटी एडीटी’चा झेंडा कन्याकुमारीत 8 सप्टेंबर रोजी फडकाविला.
या सायकल वारीतून तंबाखू, दारू, सिगारेटच्या व्यसनांपेक्षा सायकल चालविण्याचे व्यसन शाररिक तंदरूस्तीसाठी किती चांगले आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न या दोघांनी केला आहे. त्यांच्या या कामगिरीनंतर विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा.डॉ.मंगेश कराड, प्रा.डॉ.सुनिता कराड, प्र.कुलगुरू डॉ.अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ.महेश चोपडे, डॉ.सुरेश भुयार, प्रा.पद्माकर फड यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
संदीप भापकर हे विद्यापीठात रोईंग या क्रीडाप्रकाराचे प्रशिक्षक आहेत. या खेळात हातातील व पायातील ताकदीचा खऱ्याअर्थाने कस लागतो. तिच ताकद वाढविण्यासाठी (इंन्डूरन्स) संदीप यांनी सायकलींगला सुरुवात केली. त्याचा प्रारंभ, जेजरी, सिंहगड, पंढरपूरची वारी व नंतर गोवा अशा स्थानिक ठिकाणांना भेट देत केला. नंतर त्यांनी पुणे ते कन्याकुमारी हे 1600 किमींचे अंतर देखील पार केले. आता वेध लागले होते ते आशियातील सर्वांत लांब मार्ग काश्मिर ते कन्याकुमारीच्या वारीचे!
“या प्रवास अनेक अनुभवांनी समृद्ध करणारा होता. ज्यात विविधतेने नटलेल्या भारताचे अद्भुत दर्शन घडले. यातून आम्ही नशामुक्तिचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. हा सर्व प्रवास एमआयटी एडीटी विद्यापीठाने दिलेल्या मानसिक, आर्थिक पाठबळा शिवाय शक्य नव्हता. यानंतर भारताच्या नकाशाच्या बाह्यरेषेचा प्रवास करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”
– संदीप भापकर, राष्ट्रीय प्रशिक्षक रोईंग.
अखेर योजना ठरली, त्यानुसार स्वातंतत्र्यदिनी आपल्या सायकल बॉक्समध्ये पॅक करून दोघांनी झेलम एक्सप्रेसने पुणे सोडले. जम्मू गाठल्यानंतर तेथून लाल चौक, श्रीनगर पर्यंतच्या प्रवासात वातावरणाशी जुळवून घेण्यासोबतच सैन्याचे अनेक चेक पोस्ट त्यांनी पार केले. लाल चौकातून प्रवास सुरु करून रोज 200 ते 220 किमी पर्यंत सायकल चालवत, बदलणाऱ्या प्रदेशांसोबतच, बदलणारी मानसे, त्यांची भाषा, खाद्यपदार्थ, राहणीमान, ऐतिहासिक पानीपथ, आग्र्याचा लाल किल्ला अशी ठिकाणे पाहात विक्रमी वेळेत दोघांनीही भारताचे शेवटचे टोक कन्याकुमारी गाठले.
सायकल हेच आमचं व्यसन..
मध्य प्रदेशमधून जात असताना तोंडात तंबाखूचा माल भरलेल्या व्यक्तीने आम्हाला, ‘आधुनिक साधने असताना सायकलच का, व हे सर्व कशासाठी?’ असा प्रश्न विचारला. त्यावर, ‘जसे तुम्हाला तंबाखूचे व्यसन आहे, तसेच सायकल चालवणे हे आमचे व्यसन आहे. फक्त फरक एवढांच की, ते तुमचे आयुर्मान कमी करतंय तर आम्ही आमचे वाढवतोय,’ असे उत्तर दिल्याची आठवण संदीप यांनी सांगितली.