देहूगाव – देहू नगरपंचायत हद्दीतील देहू-देहूरोड मार्ग, परंडवाल चौक, देहू-आळंदी मार्ग आणि मुख्यप्रवेशद्वार ते डॉ. आंबेडकर चौक दरम्यानच्या रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे ऐन दिवाळीत नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. परंतु याकडे नगरपंचायत प्रशासन आणि पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
देहू नगरपंचायत आणि पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वयाभावी रस्त्यांच्या दुतर्फा तर रस्त्यांवरच अनधिकृत फटाके स्टॉल उभारले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक सणावेळी विविध साहित्य विक्रीची दुकाने रस्त्यावरच थाटत अतिक्रमण होत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. पथारीवाले आणि स्थानिक व्यावसायिक यांच्यात जागेवरून वाद निर्माण होत आहेत.
रस्ता रुंदीकरण कशासाठी?
तीर्थक्षेत्र विकास आराखडांतर्गत लाखो रुपये खर्चून नागरिकांची घरे दुकाने पाडून पदपथ व रस्ता रुंदीकरण केले. रस्त्यावरच बसणारे पथारीधारक आणि होणाऱ्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच होत असेल तर रस्ता रुंदीकरण कशासाठी असे दुकानदार आणि वाहन चालक बोलू लागले आहेत.
आमच्यावर नेहमी अन्याय का?
पालखी सोहळा, कार्तिकी यात्रा, बीज सोहळ्या वेळी तर एखादा मंत्री देहूत येत असल्यास मुख्यमंदिर परिसर आणि महाद्वार चौक, चौदा टाळकरी कमान, वैकुंठगमन परिसर दरम्यान नित्याचे व्यवसाय करणाऱ्या लघु दुकानदारांना नेहमी दुकाने बंद ठेवण्यास नाहक त्रास दिला जाताना प्रत्येक सण आणि प्रतिदिन होणाऱ्या अतिक्रमणे आणि पथारीधारकांकडून मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवरच नित्याचे होणाऱ्या वाहतूक कोंडीकडे प्रशासन दुर्लक्ष का करीत आहे, असा सवाल मंदिर परिसरातील व्यावसायिक, दुकानदार करीत आहेत.
दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?
रस्त्यांवर होणाऱ्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीत सापडणाऱ्या रुग्णवाहिकेतील गरोदर महिला, रुग्ण दगावल्यास अथवा एखादी आगीची दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? असा सवालही देहूकर करीत आहे.