Supriya Sule : राज्यात शिवसेनेनंतर सर्वात मोठे बंड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होऊन उभी फूट पडली. मात्र राजकीय फूट पडली असली तरी उद्योजक प्रतापराव पवार यांच्या घरी पवार कुटुंब एकत्र आल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवारांनी थेट दिल्ली गाठली. यामुळे बाहेर पवार काका-पुतणे आतून एकत्र असल्याचा चर्चा जोर धरत आहेत, याच चर्चांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यातील राजकीय चर्चांवर सुप्रिया सुळे यांनी, “वैचारिक प्रगल्भता फार महत्त्वाची आहे. मी राजकारण, समाजकारण करते ते शरद पवार व यशवंतराव चव्हाण यांच्या संस्काराने करते. यशवंतराव चव्हाणांचे संस्कार शरद पवारांवर झाले. तेच संस्कार माझ्यावर झाले. आपण मराठी माणसं फार सुसंस्कृत असतो. आपली लढाई वैचारिक आहे, वैयक्तिक नाही.”असे म्हणत कुटुंब म्हणून पवार सगळे एकत्र असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे यांनी “आमच्यासाठी तरी ही लोकशाही आहे. वैचारिक लढाई आणि प्रेमाची नाती, मैत्री, वेगळी. प्रमोद महाजन भाजपात होते, मात्र शरद पवारांचे आजही महाजन कुटुंबाशी ऋणानुबंध आहेत. प्रमोद महाजन नसले, तरी पुनम महाजन यांच्याबद्दल आजही माझ्या मनात प्रेमच आहे आणि ते कायम राहील. मुंडे कुटुंब आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या कुटुंबाबद्दलही तेच आहे”, असे मत सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केले.
तसेच “आजही दिल्लीत आमच्या घरात काही कार्यक्रम असेल, तर अटलबिहारी वाजपेयी यांची मानस कन्या आणि कुटुंब आजही येतं. अरुण जेटली, सुषमा स्वराज यांचेही कुटुंब येते. आमची लढाई वैचारिक होती, वैयक्तिक नव्हती,” असेही सुप्रिया सुळेंनी यावेळी सांगितले.