पिंपरी – शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे-मुंबई महार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौक, भगवान महावीर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, खंडोबा चौक व लोकमान्य टिळक चौकात वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. महापालिका व पोलीस प्रशासन योग्य पद्धतीने वाहतूक नियमन करण्यात अपयशी ठरत असल्याने वाहतुकीचा खोळंबा नित्याचाच झाला आहे. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पण, या बेशिस्त वाहनचालकांना शिस्त कोण लावणार? असा सवाल उपस्थित होत आहे.
पुणे-मुंबई शहरांना जोडणारा हा महत्त्वाचा महामार्ग असून, मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा असते. महामार्गावरील विविध चौकाच्या माध्यमातून उपनगरे जोडली गेली आहेत. त्यामुळे महामार्गावर व चौकात मोठी वर्दळ असते. मात्र, या महामार्गाचे व चौकांचे योग्य पद्धतीने वाहतूक नियोजन झालेले नाही. त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक वेळ ः सायंकाळी ६
पिंपरीतील महत्त्वाचा चौक असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पादचाऱ्यांना चालण्यासाठी पदपथ नाही. रस्त्यावरच वाहने थांबवलेली असतात. त्यामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून मुख्य रस्त्यावरून जावे लागते. सायकांळी वाहनांची गर्दी वाढते, त्यामुळे परिस्थिती अजून बिकट झाली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौक – वेळ ः सायंकाळी ६.१५
या चौकातून पिंपरी बाजारपेठ व मोरवाडी औद्योगिक भागातून तसेच चिंचवडकडे ये-जा करणाऱ्या वाहनचालकांची संख्या मोठी असते. मात्र, या चौकातील सिग्नलचे नियम बहुतांश वाहनचालकांकडून पाळलेच जात नाहीत. त्यात चौकाजवळच्या मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची वाहने थेट महामार्गावर लावेलली असतात. त्यामुळे या चौकात कोंडी नित्याचीच झाली आहे.
भगवान महावीर चौक, सायंकाळी ६.३०
चिंचवडमध्ये असलेल्या या चौकात हिंजवडी, थेरगाव भागात जाणाऱ्या वाहनांची वर्दळ असते. हिंजवडीच्या दिशेकडून चिंचवड स्टेशन परिसरात येण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने या चौकात कायमच गर्दी असते. मात्र या चौकालगत मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक करणारी वाहने थांबलेली असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असतो, तरीही त्या वाहनांवर कारवाई होत नसल्याचे सांगितले जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौक – सायंकाळी वेळ ६.४०
चिंचवड स्टेशन समोर हा चौक असून, मुंबई दिशेकडून एमआयडीसीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी एकेरी वाहतूक वळविण्यात आली आहे. मात्र, या चौकात बेशिस्त रिक्षाचालक रस्त्यावर थांबलेले असतात. त्यांचा वाहतुकीला अडचण होत आहे.
खंडोबा चौक, सायंकाळी वेळ ७.०५
आकुर्डी येथे असलेल्या या चौकात चिखली, मोशी, चिंचवड दिशेने जाणाऱ्या वाहनांची गर्दी असते. सकाळी कामावर जाणाऱ्या व सायंकाळी कामावरून येणाऱ्यांची संख्या या चौकात मोठी असते. त्यात सायंकाळी मोठी वाहन चालक, दुचाकी व रिक्षाचालक यांना घाई असते. त्यामुळे वाहतुकीचे तीनतेरा झाल्याचे सायंकाळी या चौकात दिसले.
लोकमान्य टिळक चौक, वेळ ७.२०
निगडीतील मधुकर पवळे उड्डाणपुलाखाली हा चौक असून, निगडी प्राधिकरण व तळवडेकडे जाणाऱ्या वाहनांची ये-जा येथे असते. मात्र, ट्रॅव्हल्स व बेशिस्त रिक्षाचालकांमुळे या चौकाचे वाहतूक नियमन कोलमडले आहे. थेट मुख्य रस्त्यावरच रिक्षा व ट्रॅव्हल्स थांबलेल्या असतात. त्यामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून जावे लागते. अशी परिस्थिती येथे दररोज असल्याचे नागरिकांनी सांगितले.