बावडा- देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून बारा बलुतेदार वर्गातील नागरिक अनेक अडचणींमुळे आर्थिकदृष्ट्या मागासलेलाच दिसून येत आहे. या वर्गातील सर्व जणांचे पारंपरिक व्यवसाय यांत्रिकीकरणानंतर आता करोनाच्या विळख्यात सापडल्याने कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत, तर अनेक व्यवसाय कालबाह्य झाले आहेत, त्यामुळे या नागरिकांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे.
आजच्या परिस्थितीत बारा बलुतेदार वर्गातील जनता अगदीच मागासलेली राहिली आहे. या सर्वांचे पारंपरिक व्यवसाय यांत्रिकीकरणाच्या विळख्यात सापडल्याने अगोदरच पूर्णपणे मोडकळीस आले आहेत. त्यातच करोनासारख्या महामारीमुळे जे संकट आले आहे, त्यात होते तेसुद्धा धुळीत मिळाले आहे, त्यामुळे या समाजासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.
बारा बलुतेदार ग्रामीण भागामध्ये पारंपरिक व्यवसायातून आपली कलाकुसर दाखवून त्यातून मिळालेल्या उत्पन्नातून आपला प्रपंच कसाबसा चालवीत असतात. यामध्ये प्रामुख्याने सुतार, सोनार, लोहार, धोबी, कुंभार, न्हावी, शिंपी, साळी, जोशी आदींची मिळून महाराष्ट्रामध्ये जवळपास पाच कोटींच्या आसपास लोकसंख्या आहे. या लोकसंख्येचा वापर राजकारण्यांकडून फक्त मतांच्या गठ्ठ्यापुरताच केला जातो. निवडणूक लागली की आम्ही बलुतेदारांसाठी हे करू, ते करू… अशा भूलथापा मारून मते मिळवण्यात यशस्वी होतात.
मात्र, त्यानंतर त्यांना दिलेल्या आश्वासनांचा दुसऱ्या निवडणुकीपर्यंत विसर पडलेलाच दिसून येतो. सध्या बलुतेदार वर्गातील सर्वांचेच पारंपरिक व्यवसाय पूर्णपणे कोलमडले आहेत. खऱ्या अर्थाने सरकारच काय पण प्रत्येक गावात, तालुक्यात, जिल्ह्यात राजकारण करताना लोकप्रतिनिधींच्याही नजरेस बलुतेदारांची जगण्यासाठीची धडपड दिसते. त्यांचे हलाखीचे जीवन, व्यवसायांना लागलेली घरघर, त्यांचा खुंटलेला विकास हे सर्व ते उघड्या डोळ्यांनी दिसत असूनही याकडे लक्ष दिले जात नाही. बलुतेदार घटकांची लोकसंख्या कित्येक गावांत बोटावर मोजण्याइतकी असते. नेमका याच गोष्टींचा फायदा घेत निवडणुका जिंकल्या जातात.
भविष्यातील अंधार स्पष्ट दिसतोय
बलुतेदार वर्गातील जवळपास सर्वच समाजांनी आपापल्या संघटना उभ्या केल्या आहेत. जेणेकरून आपण संघटित झाल्यावर आपला कुठेतरी विचार होईल; परंतु धूर्त राजकारणी त्याला पर्याय शोधून संघटनांमध्येच फूट पाडून अनेक संघटना उभारण्यास भाग पाडत असतात. यातूनच संघटना प्रमुखांनाच राजकारण्यांकडून खिशात घातले जाते. सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर राजकारण्यांचे लक्ष उपेक्षित असलेल्या बलुतेदार वर्गावर अजून तरी पडलेले दिसत नाही, त्यामुळे या वर्गाच्या भविष्यातील अंधार स्पष्ट दिसत आहे.
आश्वासनांच्या पांघरुणाखाली आवाज दबला
पारंपरिक कला कौशल्याच्या निर्मितीला खरा धोका पोहोचला तो अपारंपरिक आणि यांत्रिकीकरणामुळे. यात बलुतेदार वर्ग मात्र औद्योगिक विकासाचे वर्तमान व भविष्यात बळी ठरू नयेत, यासाठी अनेक सामाजिक संघटनांच्या व्यासपीठावरून वैफल्याची भावना अनेकदा उफाळून येते. त्यावेळी राजकारणी, आमदार, खासदार, मंत्रिगण त्या व्यासपीठावर आवर्जून उपस्थित राहून आश्वासनांचे पांघरूण घालून जातात. मात्र, पुन्हा त्यांना दिलेल्या आश्वासनांचा विसर पडतो की जाणीवपूर्वक ते सर्व काही विसरतात, हा प्रश्न कायम आहे.