नवी दिल्ली – ई-कॉमर्स धोरण आणि ई-कॉमर्स कंपन्यांच्या व्यवहारासंदर्भात व्यापाऱ्यांच्या अनेक हरकती आहेत. या संदर्भात चर्चा करण्यासाठी व्यापाऱ्याच्या संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मागितली आहे.
कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या संघटनेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आम्ही पंतप्रधान कार्यालयाला या संदर्भात पत्र पाठविले आहे. जागतिक पातळीवरील ई- कॉमर्स कंपन्या भारतामध्ये 2016 पासून यासंदर्भातील नियमाकडे दुर्लक्ष करून व्यापार करीत आहेत, असे या संघटनेचे म्हणणे आहे.
याबाबत विविध व्यासपीठावर आवाज उठवूनही उपयोग झाला नाही. त्यामुळे पंतप्रधानांनी या प्रकरणात लक्ष घालावे असे या संघटनेचे अध्यक्ष बी सी भारतीया आणि महासंचालक प्रविण खंडेलवाल यांनी सांगितले. ते म्हणाले की, या कंपन्यांच्या आर्थिक दादागिरीला कोणीतरी प्रतिबंध घालण्याची गरज आहे. या कंपन्या नियमाकडे दुर्लक्ष करून आपल्या पद्धतीने मनमानी करीत असल्याचे या दोघांचे म्हणणे आहे.
या संदर्भात पुरेशा पुराव्यासह संबंधिताकडे हरकत नोंदवूनही यासंबंधात परिणामकारक उपाययोजना केल्या नसल्याबद्दल या संघटनेने खेद व्यक्त केला आहे. स्पर्धा आयोगाने या संदर्भात सुरू केलेली कार्यवाही अतिशय मंद गतीने चालत असल्यामुळे त्या संदर्भातील निर्णय कधी होईल याबाबत आम्हाला शंका आहेत. त्यामुळे आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे या संदर्भात दाद मागणार असल्याचे या संघटनेने म्हटले आहे.