निवासस्थानांचे तब्बल 60 टक्के बुकिंग पूर्ण
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमधील पर्यटनस्थळांना प्राधान्य
पुणे – एकीकडे करोनाची दुसरी लाट येण्याचा धोका कायम असताना दुसरीकडे मात्र नागरिकांकडून पर्यटनासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिवाळी सुट्टीनिमित्त पर्यटनासाठी नागरिकांकडून यंदाही सागरी पर्यटनाला सर्वाधिक पसंती दिली जात असून, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे आतापर्यंत निवासस्थानांचे तब्बल 60 टक्के बुकिंग पूर्ण झाले आहे.
राज्य सरकारकडून अद्यापही पर्यटनावरील बंदी पूर्णपणे हटवलेली नाही. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांना जाण्यास परवानगी दिलेली नाही. मात्र, असे असतानाही सागरी पर्यटनाला नागरिकांची सर्वाधिक पसंती मिळत आहे. यासाठी महामंडळाच्या उपलब्ध निवासस्थानांचे “बुकिंग फुल्ल’ होण्यास सुरवातही झाली आहे. प्रामुख्याने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमधील पर्यटनस्थळांना प्राधान्य दिले जात आहे.
पर्यटनासाठी समुद्रकिनाऱ्यावरील बंदी लवकरच हटेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, त्याचबरोबर पर्यटकांच्या मनोरंजनासाठी स्थानिक गावकरी, लोककलाकार यांच्या सहाय्याने काही उपक्रम राबविता येतील का, याचाही विचार महामंडळ करत असल्याचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी सांगितले.
निवासस्थाने अद्ययावत सुविधेसह सज्ज
नागरिकांकडून तारकर्ली, हरिहरेश्वर, दापोली येथील सागरी किनाऱ्यावरील पर्यटनासाठी पसंती दिली जात आहे. महामंडळानेदेखील पर्यटकांच्या स्वागतासाठी सर्व निवासस्थाने अद्ययावत सुविधेसह सज्ज ठेवली आहे. तसेच, करोना सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन होईल याचीही काळजी आम्ही घेत आहोत, असे दीपक हरणे यांनी सांगितले.