दिल्ली, जयपूर, बंगळुरूच्या बाजारात लिंबाची विक्री
लिंबू प्रक्रिया उद्योगाची गरज
एकीकडे लिंबू बागेसाठी तालुक्यात जमीन व वातावरण चांगले आहे. मात्र, तरीही लिंबावर प्रक्रिया करणारा एकही प्रकल्प तालुक्यात अद्यापही कार्यान्वित झालेला नव्हता. याबाबत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून तालुक्यात लवकरच लिंबू प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती करण ढवळे यांनी दिली.
जामखेड – लिंबाचे आगार म्हणून जिल्हात प्रसिद्ध असलेले जामखेड तालुक्यातील पिपरखेड या गावाने दुष्काळातही लिंबाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊन आर्थिक उन्नती साधली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक करण अंकुशराव ढवळे यांच्या विशेष प्रयत्नातून परिसरातील शेतकऱ्यांचे रोज 14 टन लिंबाची थेट दिल्ली, जयपूर, बंगळुरू येथील मार्केटमध्ये विक्री होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भावही चांगला मिळत आहे.
पिपरखेडचे लिंबू नगर, पुणे, मुंबईच्या मार्केटमध्ये विकले जात होते. भाव मात्र कडीमोल मिळत होता. मात्र आता दिल्ली, जयपूर, बंगळुरू येथील मार्केटमध्ये लिंबला 50 ते 55 रुपये किलोपर्यंत भाव मिळत आहे. त्यातून लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळण्यास मदत झाली. लिंबाचे उत्पादन वाढवायचे, त्याचा दर्जा वाढवायचा, मार्केट अधिक मिळवायचे, हे उद्दिष्ट होते. पिपरखेड, हळगाव, फक्राबाद, गिरवली, चोंडी, धानोरा, खामगाव, नान्नज, धोंडपारगाव, भुतवडा, सोनेगाव, नायगाव, पारेवाडी, अरणगाव, जवळा, मतेवाडी, मलठण, बावी, पाटोदा, वांजरवाडी, जामखेड येथे लिंबू शेतीचा पट्टा आहे. येथील अनेक शेतकरी लिंबाची शेती करतात.
जानेवारी ते ऑगस्ट असे सलग आठ महिने लिंबाचे उत्पादन व पर्यायाने उत्पन्न सुरू राहते. यावर्षी जामखेड तालुक्याला पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्यांना टॅंकरद्वारे झाडांना पाणी घालून झाडे जागवावी लागली. त्यामुळे खर्च वाढला मात्र उत्पादन कमी मिळाले. ढवळे म्हणाले, द्राक्ष किंवा अन्य फळांइतके लिंबास जपावे लागत नाही. गेल्या दोन वर्षांत दुष्काळामुळे पाण्याचे दुर्भिक्ष होते. लिंबाचा बहार ऐन उन्हाळ्यात येतो. त्याच काळात पाणी कमी पडले. त्यामुळे बाग जगवायची कशी? हा मोठा प्रश्न होता.
मात्र न डगमगता बागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी टॅंकरने पाणी घालून बागा जगविल्या. अशा परिस्थितीत बाजार कमी झाल्याने शेतकरी वर्गात नाराजी पसरली होती. गेल्या वर्षी या काळात लिंबाला प्रतिकिलो 15 ते 20 रुपये बाजार होता. मात्र थेट दिल्ली, जयपूर, बंगळुरू येथील मार्केटमधील व्यापाऱ्यांशी सपर्क केला. तेथे लिंबू पाठविले. त्यामुळे तब्बल 50 ते 55 रुपये किलो बाजार भाव मिळत असल्याचे ढवळे यांनी सांगितले.