पुणे -इंदापूर तालुक्यातील जनता पिण्याच्या पाण्यासाठी तसेच शेतीच्या पाण्यासाठी ओरड करीत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी इंदापूरच्या पाणीप्रश्नी निर्णयाचा चेंडू पालकमंत्र्यांच्या कोर्टात टोलविला आहे. त्यामुळे इंदापूरचा पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. दरम्यान, इंदापूरला पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर झालेल्या बैठकीत पाणी सोडण्याचा अधिकार पालकमंत्र्यांचा असल्याने त्यांच्या आदेशाशिवाय पाणी सोडता येणार नाही, असे कालवा समितीचे सचिव असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्नी बाजूला येत पालकमंत्र्यांकडे बोट दाखविले आहे.
गेल्या दीड महिन्यांपासून खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील तलाव भरून घ्यावेत, यासाठी जोर पकडला आहे. त्यासाठी ते खासदार सुळे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांना घेऊन पाठपुरावा करीत आहे. मात्र, निर्ढावलेल्या प्रशासनाकडून हालचाल थंड झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांत सुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची दोनवेळा भेट घेतली. यानंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी तातडीने बैठक घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले. या बैठकीत इंदापूरला निदान पिण्यासाठी पाणी सोडा, अशी मागणी भरणे यांनी केली होती. तरीही निर्णय झाला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या ताब्यातील इंदापूर तालुक्याला सवतीचा न्याय देत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिक आणि शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.